मुंबई -लोकतांत्रिक जनता दलाप्रमाणेच राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही बिहार विधानसभा निवडणुकीत स्वबळ आजमावण्याची वेळ आली आहे. राजद, कॉंग्रेस आणि इतर लहान पक्षांचा समावेश असणाऱ्या विरोधकांच्या महाआघाडीने डावलल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे.
राष्ट्रवादीच्या निर्णयाची माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी येथे दिली. बिहारमध्ये महाआघाडीत सहभागी होण्याची राष्ट्रवादीची इच्छा होती.
बिहारमधील विधानसभेच्या एकूण 243 पैकी केवळ 5 जागा लढवण्याचा प्रस्ताव आम्ही दिला. मात्र, आमच्यासाठी एकही जागा सोडण्यात आली नाही. मी स्वत: अहमद पटेल आणि शक्तिसिंह गोहील या कॉंग्रेस नेत्यांसमवेत आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यासमवेत चर्चा केली होती, असे त्यांनी नमूद केले. सत्ताधारी जेडीयू-भाजपशी लढण्यासाठी एकत्र येण्याची भाषा केली जाते. मात्र, इतर पक्षांना महत्व दिले जात नाही, अशा शब्दांत पटेल यांनी महाआघाडीच्या रणनीतीवर नाराजी व्यक्त केली.
महाराष्ट्रात एकत्रित सत्तेवर असणारे राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष बिहारमध्ये स्वतंत्रपणे लढणार आहेत. ते दोन्ही पक्ष बिहारमध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे का, या प्रश्नावर पटेल यांनी नकारार्थी उत्तर दिले. बिहारमधील राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे शिवसेनेशी तिथे कुठला समझोता केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
बिहारमध्ये राष्ट्रवादी किती जागा लढवणार ते तूर्त समजू शकलेले नाही.