गैरकारभाराचे आरोप केल्यानंतर सभेत चकार शब्दही नाही
सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचा दिला होता इशारा
पाथर्डी – नगरपालिकेत सत्ताधाऱ्यावर राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी रविवारी गैरकारभाराचे आरोप केले. सोमवारच्या पालिकेच्या सभेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार अशी गर्जनाही लेखी निवेदनाने केली. मात्र पालिकेच्या सभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवक व नगरसेविका यांनी एक शब्दही काढला नाही. राष्ट्रवादीचा कागदावरचा विरोध हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याची टीका सत्ताधारी गटाकडून होत आहे. नगरपालिकेत साफसफाईचा ठेका संपला आहे. याबाबत गोंधळाचे वातावरण आहे.
शासकीय टॅंकरचे पाणी नेमके कोणाच्या व्यवसायासाठी व कुठे कुठे जाते? याचा तपास करण्याची गरज असून सत्ताधाऱ्यांना याचा जाब पालिकेच्या सोमवारच्या सभेत विचारू असा इशारा विरोधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिला होता. नगरपालिका हद्दीतील वाड्या-वस्त्यांसाठी किती टॅकर मंजूर केले व ते कोणत्या भागात चालू आहेत याची अद्यापही सभागृहाला व सदस्यांना कुठलीही माहीती नाही. काही सदस्यांच्या व्यवसायासाठी पाण्याचा वापर करतात. तर काही पाण्याचा व्यवसाय करत असल्याचे आम्हाला कळाले आहे. ही बाब खरी आहे का? पारदर्शी कारभाराचा आव आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये गैरप्रकार केल्याचे दिसत आहे.
नगराध्यक्षांनी येत्या आठ दिवसांमध्ये उच्चस्तरीय चौकशी करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक बंडू बोरुडे, महेश बोरुडे, गटनेत्या आसिया चांद मणियार, नगरसेविका सविता भापकर, सविता डोमकावळे, माधुरी आंधळे व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे यांनी दिला होता. सोमवारी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली पालीका सभागृहात सभा झाली.
यावेळी राष्ट्रवादीच्या एकाही नगरसेवक व नगरसेविकाने पालिका कारभाराबाबत आक्षेप नोंदविला नाही. उलट पालीका सभेत कर्मचाऱ्यांचे असणारे सर्व विषय मंजूर करण्यासाठी संमती दर्शविली. इतर कोणताही आरोप यावेळी कोणीही केला नाही. मग लेखी निवेदन देऊन प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी केली का असा प्रश्न भाजपाच्या गोटातून विचारला गेला आहे. राष्ट्रवादीचा हा युटर्न नेमका कशामुळे याची चर्चा पालिका वर्तुळात सोमवारी रंगली होती. याबाबत राष्ट्रवादीच्या गटनेत्या आसीया चॉंद मणियार यांचे पती चॉंद मणियार म्हणाले, माझ्या पत्नीला (रोजा) उपवास असल्याने तिला काही जास्त बोलता येणार नाही. मात्र इतर राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक पालिका सभागृहात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतील असे वाटले होते ते का बोलले नाहीत हे सांगता येणार नाही.