मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नसून घटनाबाह्य आहे. तसेच शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांची नेमणूक निवडणूक न घेता थेट नेमणूक केल्याचा दावा अजित पवार गटाकडून वकील विरेंद्र तुळजापूरकर यांनी केला. तसेच घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्य नाहीत मग अध्यक्ष कसे होऊ शकतात? असा सवाल करत विधीमंडळातील बहुमताला सर्वाधिक महत्व असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला.
राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज अजित पवार गटाच्या वकिलांनी सुनावणीमध्ये महत्त्वाचा युक्तिवाद केला. विरेंद्र तुळजापूरकर म्हणाले, राष्ट्रवादीच्या घटनेत नमूद असलेल्या प्राथमिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी आणि राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसाठी निवडणुकाच घेतलेल्या नाहीत. जर पक्षात निवडणुका पार पडल्या असतील तर त्याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले नाहीत, असा युक्तीवाद करण्यात आला.
तसेच स्टेट कमिटीची निवडणूक घेण्यात येणार होती. त्यासाठी सर्व नेत्यांना उपस्थित राहण्याची विनंती केली. मात्र त्यावेळी शरद पवारांनी निवडणूक न घेताच सगळ्यांची नेमणूक केली. पक्षामध्ये मतभेद आहे, कोणत्या गटाला किती पाठिंबा आहे आणि कोणता गट खरी राष्ट्रवादी आहे याचा वाद आहे, असा दावाही करण्यात आला.