मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत आणि नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गतवर्षी राज्य दहशतवादविरोधी पथकातून (एटीएस) मुंबई पोलीस दलात समाविष्ट झालेले अधिकारी दयानंद उर्फ दया नायक यांचा समावेश आहे. नायक यांच्यासह २३ अधिकाऱ्यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बढती देण्यात आली.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर म्हणजेच २०२१ मध्ये दया नायक यांची बदली गोंदिया येथे करण्यात आली होती. प्रशासकीय बदलीचे कारण त्यावेळी पुढे करण्यात आले होते. परंतु बदलीच्या आदेशाला दया नायक यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये (मॅट) आव्हान दिले होते. मॅटने बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर दया नायक एटीएसमध्ये रुजू झाले होते.
सध्या गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या दया नायक यांच्यासह पंढरीनाथ पाटील आणि सुधीर दळवी यांना बढती देत गुन्हेशाखेत तर, आर्थिक गुन्हे शाखेतील प्रकाश बागल, जगदीश कुलकर्णी आणि दिपक दळवी यांना बढती देत आर्थिक गुन्हे शाखेतच नियुक्ती देण्यात आली आहे. नागपाडा पोलीस ठाण्यातील सचिन कदम यांना बढती देऊन आर्थिक गुन्हे शाखेत आणि आर्थिक गुन्हे शाखेतील अजय जोशी यांना बढती देऊन मुलुंड पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.