सातारा – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार पाच वर्षे उत्तम पद्धतीने चालवला. या कार्यकुशल नेतृत्वामुळे काहींचा पोटशूळ उठला आहे, असेच म्हणावे लागेल. देवेंद्रजींवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंचा “गेम’ करून त्यांना पक्षात घेतले आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी येथे केली.
सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा दरेकर यांनी गुरुवारी केला. त्यावेळी सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना दरेकर यांनी राज्य शासनावर कडाडून टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडून त्यांची छबी बदनाम करण्यासाठी खडसे यांचा वापर करण्यात येत आहे. फडणवीसांवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने खडसेंचा “गेम’ केला आहे. तेथे राहून खडसे यांनी समाजकार्य करावे.
“नांदा सौख्यभरे’, अशा त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असा टोला दरेकर यांनी लगावला. अर्णब गोस्वामी प्रकरणात वकील नेमण्यासाठी राज्य शासनाने 15 लाख रुपये दिले. तेवढी तत्परता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यात का दाखवली जात नाही? अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बळीराजा हवालदिल झाला आहे.
अशा वेळी राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. त्यांना तातडीने आर्थिक मदत करणे जरुरी आहे; पण राज्य शासनाने सुशांत सिंह प्रकरणात वकील नेमण्यासाठी 15 लाखांची तरतूद केली. ही तत्परता शेतकऱ्यांना करण्यासाठी दाखवली जात नाही. त्यासाठी केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. ते अत्यंत चुकीचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
उदयनराजेंबरोबर “अ’राजकीय चर्चा
सातारा-जावळी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा सुरू करण्यापूर्वी प्रवीण दरेकर यांनी सकाळी जल मंदिर येथे जाऊन खा. उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. त्यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सुनील काटकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक सुनिल काळेकर उपस्थित होते.
या भेटीत दरेकर व उदयनराजे यांच्यात अनौपचारिक गप्पा झाल्या. त्यात कोणतेही राजकीय संदर्भ नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरेकर यांनी उदयनराजेंना अगदी वाकून नमस्कार केला, याचीच चर्चा झाली. भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्याही भेटीगाठी दरेकर यांनी घेतल्या.