नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेसने काल भारत बचाओ रॅलीचे आयोजन केले होते. परंतू, या रॅली दरम्यान राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केल्यामुळे देशभरातून टीकेचा सूर उमटत आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेकडूनही सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, शिवसेनेच्या या भूमिकेवर आता राज्यात सध्या महाविकास आघाडीच्या भविष्यावरही आता चर्चा झडत आहेत.
याचदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एक व्टि केले असून त्यात त्यांनी संजय राऊत यांनाही टॅग केले आहे. भविष्यात अजून अनेक परीक्षा द्याव्या लागणार आहेत, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या सावध केले आहे.
सितारों के आगे जहाँ और भी हैं
अभी इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं
: इक़बाल@rautsanjay61— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 15, 2019
नवाब मलिक यांनी उर्दू शायर इक्बाल यांच्या ओळी शेअर केल्या आहेत.
सितारों के आगे जहॉं और भी हैं, अभी इश्क़ के इम्तिहॉं और भी हैं असे त्यांनी आपल्या व्टिमध्ये म्हटले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुनही कॉंग्रेस आणि शिवसेनेची भूमिका सुरुवातीला वेगळी होती. परंतु, राहुल गांधी यांच्या व्टिनंतर लोकसभेत विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत सभात्याग केला होता. त्यामुळे शिवसेनेवर टीकाही झाली होती. सत्तेसाठी सेनेने विधेयकाला विरोध केल्याचे बोलले जात होते.
सेनेच्या सुरुवातीच्या भूमिकेवर राहुल गांधी यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात आले होते. मागील 8 दिवसांत कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यातील वैचारिक मतभेद समोर आले आहेत. भाजपने याप्रकरणी शिवसेनेवरही टीका केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी हे सूचक व्टि केले आहे.