मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता यावे याकरता राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालायने आज सुनावणीत निर्णय राखून ठेवला आहे. उद्या दुपारी अडीच वाजता त्यांच्या याचिकेवर निर्णय जाहीर देण्यात येणार आहे.
या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांचे वकिल आणि ईडीचे वकिल यांच्यात खडाजंगी झाली. राज्यसभा निवडणुकीसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत उशीर होऊ नये याकरता नवाब-देशमुखांनी आधीच याचिका दाखल केली. त्यासाठी त्यांना मतदानासाठी परवानगी मिळावी याकरता मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत मतदान करण्याची संधी द्यावी, अशी विनंती अनिल देशमुख यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयाला केली आहे. केवळ मतदानाच्या दिवशी मत टाकण्यासाठी पोलिस सुरक्षा व्यवस्थेत पाठवण्याचे निर्देश द्यावेत, एवढीच मर्यादित विनंती आहे, असे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी युक्तीवाद केला.
मतदान करणे हा मूलभूत हक्क नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून मतदान करणे हा घटनात्मक हक्क आणि कर्तव्य आहे. अशा स्थितीत न्यायालय आपल्या विशेषाधिकारात केवळ काही तासांपुरता तात्पुरता जामीन देऊ शकते. तेवढीच आमची विनंती आहे, असं म्हणणं मलिक यांच्यातर्फे अमित देसाई यांनी आज न्यायालयापुढे मांडले.