अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सरकारमधील महिला मंत्र्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर कुपोषणाच्या मुद्द्यावरून खळबळजनक आरोप केले आहेत. यशोमती ठाकूर यांनी महिला व बालकल्याण विभागात 800 कोटींचा घोटाळा केला असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांनी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांची भेट घेऊन तक्रार केली आहे.
नवनीत राणा यांनी इराणी यांची भेट घेऊन तक्रार केली की, महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुंना सरकारतर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार आणि अन्य आवश्यक वस्तू न मिळाल्यामुळे गेल्या तीन महिन्यात मेळघाटात 49 नवजात शिशुंचा मृत्यू झाला आहे.
तसेच उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्ट केलेल्या तसेच महिला बालकल्याण विभागात पुरवठा किंवा कंत्राट घेण्यास मनाई केलेल्या समृद्धी आणि व्यंकटेश या कंपन्यांना पळवाट शोधून उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करण्यात आली आहे आणि कंझुमर फेडरेशनच्या माध्यमातून पुरवठा करण्याचे काम देण्यात आले आहे.
इतकंच काय तर यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांच्याच जिल्ह्यात इतक्या बालकांचा कुपोषणाने मृत्यू होणे ही अत्यंत खेदजनक तसेच लाजिरवाणी बाब असल्याचंही राणा यांनी तक्रारीत म्हटले आहे.
नवनीत राणा यांनी गंभीर आरोप केल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी फेसबूक लाईव्ह केले. या लाईव्हमध्ये ठाकूर यांनी या प्रकरणावर खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधत महाराष्ट्राच्या आणि अंगणवाडीताईंचा राणा यांनी अपमान केल्याचे ठाकूर म्हणाल्या आहेत.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मेळघाटातील बालमृत्यूप्रकरणात राजकारण आणण्याचा प्रयत्न केला असून काही कंत्राटदारांच्या प्रेमापोटी आज राज्यातील तमाम अंगणवाडी ताईंचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचे नाव खराब करायचे काम राणा यांनी केले आहे असे प्रत्युत्तर ठाकूर यांनी दिले आहे.