नवी दिल्ली – देशाच्या विविध भागातील मालवाहू वाहनांचे चालक आणि वाहतूकदार केंद्र सरकारच्या नवीन हिट ॲन्ड रन कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले असून आजही त्यांच्या आंदोलनाची तीव्रता अधिक होती. ट्रक व टँकर चालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल टंचाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने विविध शहरांतील पेट्रोल पंपांवर नागरीकांनी गर्दी केल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहाण्यास मिळाले.
भारतीय दंड संहितेची जागा भारतीय सध्या न्याय संहितेने घेतली आहे. यात जे वाहनचालक निष्काळजीपणे वाहन चालवून गंभीर रस्ता अपघात घडवून आणतील आणि पोलिसांना माहिती न देता पळून जातील त्यांना १० वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा किंवा ७ लाखांचा दंड होऊ शकतो. यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये आयपीसीमध्ये दोन वर्षांची शिक्षा होती.
खाजगी वाहतूक ऑपरेटरांचा या नव्या कायद्याला सक्त विरोध आहे. त्यामुळे त्यांनी बंद आंदोलन पुकारले आहे. त्यांचा असा दावा आहे की जेव्हा चालक जखमींना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते जमावाच्या हिंसाचाराला बळी पडू शकतात.
हिट-अँड-रन प्रकरणांवरील नवीन कायद्याच्या विरोधात वाहतूक संघटना आणि चालकांनी केलेल्या निषेधावर, ऑल इंडिया मोटर अँड गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष, राजेंद्र कपूर म्हणाले, “सरकारकडे आमची एकच मागणी आहे की या बाबत सर्व संबंधीतांशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता. यावर आमच्याशी कोणीही चर्चा केली नाही आणि कोणालाही याबद्दल विचारले गेले नाही.
प्रत्यक्ष कायदा अंमलात आणण्यापुर्वी याआधी बैठका आणि सल्लामसलत व्हायला हवी होती. ऑल इंडिया मोटर अँड गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या अन्य सदस्यांनीही याचा निषेध केला आहे. दरम्यान, वाहतूकदार आणि चालकांनी या प्रकरणी देशभर आपले आंदोलन तीव्र केले आहे.
त्यातून काही ठिकाणी हिंसक प्रकार ही झाले. खासगी बस आणि ट्रक चालकांनी सोमवारी नवीन हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ मध्य प्रदेशात राज्यभर ‘चक्का जाम’ लागू केला. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्येही अशाच प्रकारचा निषेध करण्यात आला, जिथे बस चालकांनी नवीन केंद्रीय कायद्याविरोधात निदर्शने केली.