नवी दिल्ली – संपावर गेलेले ट्रकचालक केंद्र सरकार आणि वाहतूकदारांमधील समझोत्यानंतर कामावर परतू लागले आहेत. त्यामुळे एक-दोन दिवसांत मालवाहतूक सुरळित होईल, अशी ग्वाही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस या मालवाहतूकदारांच्या संघटनेने बुधवारी दिली.
भारतीय न्याय संहिता या नव्या कायद्यात हिट ॲंड रनशी संबंधित प्रकरणांत कठोर शिक्षा आणि दंडाची तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्या तरतुदींना विरोध दर्शवण्यासाठी ट्रकचालकांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत झाला. त्यातून स्थिती गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाल्याने केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी मंगळवारी सायंकाळी मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
त्या बैठकीत दोन्ही बाजूंमध्ये समझोता झाला. त्यामुळे मंगळवारी रात्री सरकारबरोबरच मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसने ट्रकचालकांना कामावर परतण्याचे आवाहन केले. त्यातून संप मिटण्यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, ट्रकचालकांचा संप उत्स्फूर्त होता. आम्ही संपाची कुठलीही हाक दिली नव्हती, असे मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत सरकारने नव्या कायद्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याकडे लक्ष वेधले. तसेच, हिट ॲंड रनविषयक तरतुदींबाबतचा पुढील निर्णय वाहतूकदारांशी सल्लामसलत करूनच घेण्याची ग्वाहीही दिली. त्यामुळे वाहतूकदारांचे समाधान झाल्याचे समजते.