नगर – राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये उद्भवलेल्या स्थितीचा नुकताच आढावा घेतला. पक्षाच्या महिला आघाडीच्या शहर-जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे यांनी या मंत्र्यांशी व्हिडीओ कॉलींगद्वारे माहिती दिली.
हातावर पोट असलेल्या घटकास आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा प्रतिष्ठान करत असलेल्या मदतीबद्दल या मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच या पुढील काळात लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढणार असल्याची शक्यता व्यक्त करुन मदतीचे हात आणखी बळकट करण्याच्या सूचना दिल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रेश्मा आठरे यांच्याशी सुमारे अर्धा तास या मंत्र्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा केली. सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत कशा पद्धतीने पोहचविता येतील, सोशल मिडियाद्वारे समाजामध्ये त्यासंदर्भात जनजागृती करावी, अशा सूचनही या मंत्र्यांनी केल्याचे आठरे यांनी सांगितले.
रेशनद्वारे गोरगरिबांना धान्य पुरवठा होतो की नाही याची काळजी घेणे, भाजीपाला आणण्यासाठी गर्दी न करता कडधान्याचे आवाहन करा. ज्यांना कुपन नाही, त्यांना शिवभोजन थाळी केंद्राची माहिती द्या. पोलिस प्रशासन व आशा वर्कर यांच्याबद्दल समाजामध्ये कृतज्ञता व्यक्त करा. सामाजिक संस्थांनी पुढे येऊन सर्व सामान्य जनतेला मदत करण्याचे आवाहन करावे, असेही ते म्हणाले.