-जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांत भाजप शिवसेनेच्या हालचाली गतीमान
-मातब्बरांपुढे अस्तित्त्वाचे आव्हान
-श्रीकांत कात्रे
सातारा – उन्हाचा पारा यावर्षी अधिक तीव्रतेने वाढत गेला. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वातावरण गरम झाले आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला लोकसभेनंतर आता विधानसभेतही धक्का देण्यासाठी युतीतील पक्षांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील बड्या नेत्यांना गळाला लावण्याचे काम युतीच्या प्रमुख नेत्यांनी गतीने सुरू केले आहे.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या नावांची चर्चा झडत असतानाच सातारा जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातही आव्हान पेलणारे पर्यायी उमेदवार आपल्याकडे आणण्यासाठी युती जंग जंग पछाडत आहे. त्यामुळेच सातारा जिल्ह्यातील राजकीय गोटात औत्सुक्याच्या वातावरणाबरोबरच अस्तित्त्वाची लढाई सुरू राहणार आहे. भाजप- शिवसेनेच्या हालचालींमुळे दोन्ही कॉंग्रेसची मात्र पळता भुई थोडी होणार हे निश्चित आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्यांना गाफिल न राहता हे आव्हान पेलावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत माढ्यातून भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विजय मिळवून राष्ट्रवादीला धक्का दिला. साताऱ्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उदयनराजे भोसले यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. मात्र, मताधिक्य कमी झाले. त्याचा फायदा घेण्यासाठीची रणनीती भाजप आणि शिवसेना आखत आहे. गेल्या काही वर्षांपासूनच भाजपने नियोजनबद्ध पद्धतीने काही मतदारसंघात काम सुरू ठेवले आहे. प्रमुख नेते चंद्रकांत पाटील यांनी पक्षसंघटना वाढविण्यासाठी जबरदस्त संपर्क वाढविला आहे.
सातारा, वाई, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, पाटण, कोरेगाव, माण आणि फलटण असे आठ विधासभा मतदारसंघ जिल्ह्यात आहेत. त्यापैकी माण व खटाव हे दोन मतदासंघ माढा लोकसभा मतदारसंघात तर उर्वरित सातारा मतदारसंघात आहेत. लोकसभा निवडणुकीत कऱ्हाड दक्षिण, पाटण, माण आणि फलटण या चार मतदारसंघांत युतीच्या उमेदवारांनी मताधिक्य मिळवले आहे. तर इतर मतदारसंघातही युतीच्या मतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ही बाब दोन्ही कॉग्रेसच्या नेत्यांपुढे अनेक प्रश्नचिन्ह घेऊन उभी आहे. या स्थितीत सावध राजकीय खेळी करीत अधिकाअधिक लोकांपर्येत पोहचण्यासाठी वेगवेगळ्या निमित्ताने मतदारसंघात संपर्क करण्यावर सर्वांनीच भर दिला आहे.
साताऱ्यातील दोन आणि माढ्यातील दोन अशा चार मतदारसंघांतून युतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले. या चार मतदारसंघांमध्ये भाजप- शिवसेनेकडून अधिक ताकद देऊन गड काबीज करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा होणार आहे. वास्तविक दोन्ही कॉग्रेसच्या कागदावर दिसणाऱ्या वर्चस्वाला लोकसभा निवडणुकीत चांगला शह मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या प्रचारात विधानसभेची रंगीत तालीम समजून आमदारांसह प्रमुख नेतेमंडळी, कार्यकर्ते यांनी जोर लावला होता. मात्र, कोणाचेही न ऐकता स्वताच ठरवून मतदान करण्याकडे मतदारांनी कल दाखविला. कॉंग्रेस संस्कृतीतून जडणघडण झालेल्या सातारच्या मातीचा रंग बदलू लागल्याची चिन्हे दिसली. विशेषतः युवावर्ग तसेच महिलावर्ग वेगळा विचार करून निर्णय घेऊ लागला आहे.
ही आघाडीच्या इच्छुकांसाठी धोक्याची घंटा आहे. तर युतीच्या उमेदवारांची उमेद वाढविणारी बाब आहे. हे लक्षात घेऊनच दोन्ही बाजूंकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. भाजपने काही मतदारसंघात यापूर्वीच काही संभाव्य उमेदवारांची नावे ठरवून आखणी केली होती. पाटणमधून शिवसेनेचे शंभूराज देसाई विद्यमान आमदार आहेत. कऱ्हाड दक्षिणमध्ये डॉ. अतुल भोसले, कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे किंवा धैर्यशील कदम, कोरेगावातून महेश शिंदे, साताऱ्यातून दीपक पवार, भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले मदन भोसले वाईतून रिंगणात असतील, अशी चर्चा पूर्वीपासूनच आहे. अर्थातच हे मतदारसंघ भाजपकडे असतील, असा आडाखा बांधून भाजपने या मतदारसंघांतून पेरणी केली आहे. काही उमेदवारांनी संपर्कही बळकट केला आहे.
आठपैकी सहा मतदारसंघात युतीने मजबूत शिरकाव केला आहे. काही वर्षांपूर्वी नगण्य ताकद असणाऱ्या युतीतील पक्षांनी ताकद वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे कॉंग्रेस संस्कृतीला तडाखा देण्याची प्राथमिक तयारी केली आहे. युतीकडून जिल्ह्यातील काही मातब्बरांना आपल्याकड वळविण्याचे आटोकाट प्रयत्न होतील. काही महिन्यात सारे डावपेच स्पष्ट होतील. सुंदोपसुंदीच्या राजकारणात लोकांच्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष युतीच्या पथ्यावर पडणार आहे. लोकच आता शांत राहून रंगणाऱ्या राजकारणाला दिशा देण्याची शक्यता आहे.
फलटण व माण मतदारसंघातही बदलत्या परिस्थितीत युती आता भक्कमपणे आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे. फलटणमध्ये विधानसभेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाच्या एकतर्फी वर्चस्वाला लोकसभा निवडणुकीत भाजपने धक्का दिला आहे. नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयी होण्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेससमोरील अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण रिंगणात असतील किंवा यावेळी बदल होणार याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, रामराजे ठरवतील तोच उमेदवार हे समीकरण फलटणमध्ये आहे. रणजितसिंह यांचे निकटचे समर्थक दिगंबर आगवणे रिंगणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे फलटणची यावेळची निवडणूक राष्ट्रवादीसाठी पूर्वीइतकी सोपी राहिलेली नाही. माणमध्ये तर कॉंग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनीच भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यात उघडपणे हातभार लावला. त्यामुळे भाजपचे उमेदवार आमदार गोरे असणार की डॉ. दिलीप येळगावकर, शेखर गोरे, अनिल देसाई की रासपचे कोणी या इतर अनेक इच्छुकांपैकी एक असेल याबाबतची अनिश्चितता आज असली तर युती आता हा मतदारसंघ खेचून घेण्याची संधी सोडणार नाही, अशाच हालचाली वेगवान झाल्या आहेत. राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे किंवा सदाशिवराव पोळ यांच्या घरातील उमेदवार हा तिढा असणार आहे. मात्र, या मतदारसंघातील रंगत खुलत जाणार हे नक्की आहे.