भिगवण – शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण जीवनाचे आकलन होऊन विद्यार्थ्यांना ग्रामीण प्रश्नांची जाणीव होते. राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना जीवनमूल्याचे शिक्षण देते. म्हणूनच युवकांच्या जडणघडणीत राष्ट्रीय सेवा योजना अग्रस्थानी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार व ससंदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला महाविद्यालय व दत्तकला शिक्षण संस्थेच्या औषध निर्माणशास्त्र व अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ होते. पराग जाधव, अशोक शिंदे, रणजित भोगळे, संपत बंडगर, सुनिल वाघ, अशोक शिंदे, जयदीप जाधव, रियाज शेख, संजय चौधरी, अजित क्षीरसागर, संजय रायसोनी आदी उपस्थित होते.
अध्यक्ष प्रा. रामदास झोळ म्हणाले की, कल्पना विश्वास जगणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजाच्या वास्तवाचे भान येते. विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व समजून जागतिकीकरणाला सामोरे जाण्यास सक्षमता प्राप्त होते. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती पुष्पा रेडके, उपसभापती संजय देहाडे यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिरात एकूण 125 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. शाम सातर्ले यांनी केले, तर प्रा. पद्माकर गाडेकर यांनी आभार मानले.