एक तास चर्चा : दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता
मुंबई : लोकसभा निवडणूकीदरम्यान ‘ए लाव रे तो व्हिडिओ’… असे सांगत प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात टिकेचा धुरळा उडविणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंगळवारी गुप्त भेट झाली. राज्यात शिवसेनेने कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर एकाकी पडलेल्या भाजपाने आपला नवा भिडू शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यापाश्वभूमिवर फडणवीस यांची ही भेट महत्वाची मानली जाते. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली असली तरी त्यांच्या भेटीमागचा तपशिल समजलेला नाही. मात्र, या भेटीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर सत्तेतील वाटपावरून बिनसल्यानंतर शिवसेनेने भाजपाशी फारकत घेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सरकार स्थापन केले. शिवसेनेच्या या खेळीमुळे भाजपा राज्यात एकाकी पडला आहे. अशा परिस्थितीत भाजपा आपला नवा भिडूच्या शोधात आहे. सोमवारी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे भविष्यात भाजपाशी युती करू शकतो, असे संकेत दिले होते. नांदगावकर यांच्या विधानाला चोवीस तासही होत नाहीत तोच भाजपाचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची मंगळवारी दुपारी परळ येथे एका बिझनेस सेंटरमध्ये भेट झाली. विशेष म्हणजे भाजपाचे माजी मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांची भेट घेऊन युतीचे संकेत दिले होते.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सरकार स्थापन करणारी शिवसेना हिंदुत्व विसरली आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे शिवसेनेची जागा राज ठाकरेंची मनसे भरुन काढू शकते अशीही चर्चा होत आहे. तसेच भाजपालाही हिंदुत्ववादी भूमिका असलेल्या पक्षाची साथ हवीच आहे. दरम्यान या सगळ्या चर्चांच्या पाश्वभूमीवर फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जाते आहे.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला पूरक ठरेल असा प्रचार राज ठाकरे यांनी केला होता. मात्र त्याच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेनेची साथ दिल्याने मनसेची राजकीय कोंडी झाली होती. मनसेचा विधानसभा निवडणुकीत एकच आमदार निवडून आला आहे. विधानसभेत राज्य सरकारच्या विश्वासदर्शक प्रस्तावावेळी मनसे तटस्थ राहिली होती. त्यामुळे लोकसभा निवडणूकीदरम्यान राज ठाकरेंनी केलेले आरोप विसरून मनसेला जवळ करण्यास भाजपा राजी असल्याचे समजते.
मनसे झेंड्याचा रंग बदलणार
शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी मनसेची स्थापना केली. या पक्षाला आता 14 वर्षे झाली. मनसेने पक्ष स्थापन करतेवेळी पक्षाचा झेंडा आणि आपली निशाणीही घोषित केली होती. परंतु, बदलत्या राजकारणात मनसे आमुलाग्र बदल करणार आहे. त्यापाश्वभूमीवर मनसे आपला झेंडाही बदलणार असल्याचे बोलले जात आहे. मनसेच्या नव्या झेंडयाचा रंग भगवा असणार असल्याचेही समजते.
23 जानेवारीला राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत गेल्याने शिवसेनेला आता आपली कडवट हिंदुत्ववादी भूमिका मवाळ करावी लागली आहे.यामुळे नाराज होणाऱ्या हिंदुत्ववादी मतांना स्वतःकडे खेचण्यासाठी मनसेला हिंदुत्ववादी भूमिका घेता येउ शकेल. येत्या 23 जानेवारी रोजी मुंबईत मनसेचे महाअधिवेशन आहे. या महाअधिवेशनात राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करतील. यामुळे राज ठाकरे आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.