सभापतिपदी दत्तात्रय बोऱ्हाडे, तर उपसभापतिपदी दत्ता देशमुख यांची निवड
अकोले – अकोले तालुका पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकला. मात्र यावेळी महायुतीचा नव्हे, तर भाजपचा फडकला. भाजपचे दत्तात्रय बोऱ्हाडे सभापतीपदी, तर दत्तात्रय देशमुख उपसभापतिपदी निवडून आले. हात वरकरुन झालेल्या निवडणुकीत दोन्ही ही नूतन पदाधिकाऱ्यांनी समोरचे प्रतिस्पर्धी उमेदवार संत नामदेव आंबरे व गोरख पथवे यांचा सात विरुद्ध पाच मतांनी पराभव केला.
आज पंचायत समिती सभागृहामध्ये झालेल्या सभापती, उपसभापती निवडीच्या प्रसंगी पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी काम पाहिले. त्यांना तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सहकार्य केले. कोकण दौऱ्यावर गेलेले भाजप गटबंधन असणारे सर्व 7 सदस्य आज लवकरच सभापती, उपसभापती निवडीच्या हॉलमध्ये हजर झाले.
त्यानंतर उशिराने महाआघाडीचे उमेदवार हजर झाले. प्रारंभी सभापतिपदी दत्तात्रय बोऱ्हाडे यांनी अर्ज दाखल केला. त्यांना माधवी जगधने सूचक होत्या. उपसभापतिपदी दत्तात्रय देशमुख यांनी आपला अर्ज दाखल केला. त्यांना सूचक म्हणून सीताबाई गोंदके या होत्या. त्यानंतर संत नामदेव आंबरे यांनी आपला अर्ज दाखल केला. उपसभापतीपदी गोरख पथवे यांनी अर्ज दाखल केला. तेही ही पाच जण गटाने आले. त्याच वेळेला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता.
अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानंतर माघारीची वेळही संपली.
माघारीची वेळ संपल्यानंतर पीठासीन अधिकारी मंगरुळे यांनी हात वर करून मतदान प्रक्रिया पार पाडली. त्यावेळेला सभापतिपदी बोऱ्हाडे यांची निवड झाल्याचे त्यांनी घोषित केले. उपसभापतिपदासाठीही तिच पद्धत वापपण्यात आली. त्यावेळेस देशमुख यांची निवड झाल्याचे त्यांनी घोषित केले. त्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा तेथेच सत्कार करण्यात आला.
या दरम्यान बाहेर 1997 सालच्या घटनेची पुनरावृत्ती करणारा समुदाय न्यायालयाच्या प्रांगणात आणि पंचायत समितीच्या बाहेर हजर होता. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 1997 साली दगडफेक झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला होता. दगडफेकीमध्ये तेव्हाचे विद्यार्थी आजचे वकील बी. जी. वैद्य हे जखमी झाले होते.
तर त्यावेळेस कॉंग्रेस गटातील माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे समर्थक तेही मधुकर पिचड यांनी समोरच्या विरोधी गटामध्ये जाऊन खळबळ माजवून दिली होती. परंतु स्वतः मंत्री पंचायत समितीच्या दारी येऊन त्यांनी तेथेच ठिय्या मांडला आणि मधुकर पिचड यांना पकडून त्यांच्या समर्थकांनी फुटीर पिचडची यथेच्छ धुलाई केली होती. या घटनेची याद यावेळेस सर्वांना आली.
अशीच परिस्थिती उद्भवली, तर वातावरण बिघडायला नको म्हणून पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे व जवळपास शंभर ते दीडशे पोलिस व गृहरक्षक दलाच्या जवानांनी पंचायत समिती परिसराला लष्करी छावणीचे रूप प्राप्त करून दिले होते. या तणावाच्याखाली ही निवडणूक प्रक्रिया तणावपूर्ण वातावरणात परंतु शांततेत पार पडली. बाहेर माजी आमदार वैभवराव पिचड, त्याचबरोबर त्यांचे असंख्य कार्यकर्ते बाहेर आले आणि नूतन सभापती आणि उपसभापती यांना घेऊन भाजपाच्या पक्ष कार्यालयाकडे गेले.
या दरम्यान घोषणाबाजी, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी झाली. या प्रसंगी माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुकरराव नवले, जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केले. सूत्रसंचालन पक्षाचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.
तर गिरजाजी जाधव यांनी आभार मानले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गटनेता म्हणून गोरख पथवे यांची नियुक्ती केलेली होती. तथापि, त्यांनी काढलेला आदेश इतर तिघांनी झुगारला. म्हणून हा वाद औरंगाबाद खंडपीठाकडे गेलेला असून, यासंदर्भात रिट पिटीशन दाखल करण्यात आले आहे आणि या अनुषंगाने याची सुनावणी येत्या पंधरा तारखेला होणार आहे, असे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी सांगितले.