श्रीनगर: जम्मू काश्मीरातील राजकीय प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी सरकारने राज्यातील राजकीय कैद्यांची त्वरीत मुक्तता करावी अशी मागणी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने केली आहे. या संबंधात जारी केलेल्या एका निवेदनात पक्षाने म्हटले आहे की सरकारने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तीन महिने झाले असूनही अनेक पक्षांच्या राजकीय नेत्यांना अजून अटक किंवा स्थानबद्ध करून ठेवण्यात आले आहे.
अन्य कार्यकर्त्यांचीही धरपकड करण्यात आली असून त्यांची मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेली ही मुस्काटदाबी आहे. गेले तीन महिने, काश्मीरातील लोकांना जगाच्या अन्य भागाशी असलेला संपर्क साधण्यास अनुमती नाकारली गेली आहे. अजूनही त्यांच्या इंटरनेट सेवा बंद आहेत. काश्मीर बाहेरील नातेवाईकांना काश्मीरात येऊ दिले जात नाही. आणि आतील लोकांनाही बाहेर जाऊ दिले जात नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांवर भीषण स्थीती ओढवली आहे असे नॅशनल कॉन्फरन्सने म्हटले आहे. नागरीकांना एसएमएस सेवाही मिळू दिली जात नसल्याची तक्रारही या पक्षाने केली आहे . सरकारने काश्मीरातील सर्व व्यवहार सुरूळीत करण्याचे काम करावे आणि अटक अथवा स्थानबद्ध असलेल्यांची त्वरीत सुटका करावी असे कळकळीचे आवाहन या पक्षाच्या निवेदनात करण्यात आले आहे.