Narendra Modi | Sonia Gandhi – पंतप्रधान मोदींनी देशाची प्रतिष्ठा आणि लोकशाही यांच्यावर आघात करून ती उद्धवस्त केली आहे असा आरोप काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. विविध डावपेचांचा व दबावांचा वापर करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोडले जात असून त्यांची भाजप मध्ये जबरदस्तीने भरती करून घेतली जात आहे असा आरेापही त्यांनी केला आहे.
राजस्थान प्रदेश कॉंग्रेसने निवडणूक प्रचारानिमीत्त येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. माजी काँग्रेस प्रमुखांनी दावा केला की, गेल्या १० वर्षांपासून देशात बेरोजगारी, महागाई, आर्थिक संकट आणि असमानता यांना चालना देण्याचेच काम या सरकारने केली आहे. आज आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आली आहे.
लोकशाही संस्था उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि आपली राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे,” असा आरोप करत त्या म्हणाल्या, ही हुकूमशाही आहे आणि आम्ही सर्वजण याला उत्तर देऊ.स्वतःला महान समजणारे मोदीजी देशाच्या आणि लोकशाहीच्या प्रतिष्ठेला तडा देत आहेत,असा आरोपही सोनिया गांधी यांनी केला.
तत्पूर्वी कार्यक्रमाला संबोधित करताना, पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना केंद्रातील भाजपच्या राजवटीने जी अटक केली त्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना ऐन निवडणूक काळात तुरूंगात टाकले जात आहे असे त्या म्हणाल्या.
देशात बेरोजगारी आणि महागाई शिगेला पोहोचली आहे आणि सरकारी नोकर भरतीच्या पेपर फुटीचे प्रकार प्रत्येक राज्यात होत आहेत. आज या देशात गरीब आणि शेतकऱ्यांचे ऐकणारे कोणी नाही,असे त्या म्हणाल्या.
या पाश्र्वभूमीवर कॉंग्रेसने जाहीरनाम्यात ज्या हमी दिल्या आहेत, त्या विषयी प्रियंका म्हणाल्या की, आम्ही आमच्या जाहीरनाम्याला ‘न्याय पत्र’ असे नाव दिले आहे. हा जाहीरनामा केवळ घोषणांची यादी नाही.यातील घोषणा निवडणुकीनंतर विसरल्या जाणार नाहीत. हा देशाचा आवाज आहे ज्याला न्याय हवा आहे असे त्या म्हणाल्या. । Narendra Modi | Sonia Gandhi