पुणे – धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरकचतुर्दशी असते. या दिवसाच्या आध्यात्मिक महत्त्वासंदर्भात असे सांगतात की, नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठावे. संपूर्ण शरीरास सुवासिक तेल उटणे लावून, तेलाने चांगले अंग चोळून घेऊन उष्णोदकाने चांगले स्नान करावे या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्रे परिधान करायची.
देवदर्शन घ्यायचे. आधी देवाला आणि मग सर्वांनी एकत्र जमून दिवाळीच्या फराळाचा मनमुराद आस्वाद घ्यायचा असा हा दिवस. या दिवसा संदर्भात जी एक पौराणिक कथा सांगितली जाते ती अशी कीद्वापार युगात नरकासूर नावाचा एक राक्षस राज्य करीत होता. तो अत्यंत क्रूर, वाईट प्रवृत्तीचा होता. नरकासुराने प्रचंड मोठे तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले होते.
त्याने अवध्यत्वाचा म्हणजेच कुणाही पुरूषाकडून वध होणार नाही असा वर ब्रह्मदेवाकडून मिळवला होता. त्यामुळे उन्मत्त होऊन त्याने त्या वराच्या योगाने अनेक निरापराध राजांना, राजकन्यांना, अबलांना, स्त्रियांनाही आपल्या बंदीवासात डांबले होते. इतकेच नव्हे तर त्याने अगणित संपत्ती लुटली होती. स्वार्थ, लोभ आणि हावेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छत्रही बळकावले होते.
त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव, गंधर्व व मानवाला तापदायक झाला होता. श्रीकृष्णाला हे समजले. त्याने नरकासुराचा नाश करण्याचे ठरविले. त्याच्याशी युद्ध करण्याची तो तयारी करू लागला. ही बातमी कृष्णाची पत्नी सत्यभामा हिला समजली. ती कृष्णाकडे आली आणि म्हणाली, “त्या दृष्ट राक्षसाने स्त्रियांना त्रास दिला आहे ना? मग मीच त्याच्याशी युद्ध करून त्याला मारील. तुम्ही मला फक्त मदत करा.’ रथात बसून सत्यभामा नरकासुराचा नाश करायला निघाली.
मदतीला श्रीकृष्ण होताच. तिने नरकासुराशी युद्ध करून अश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी भल्या पहाटे त्याचा वध केला. श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदिशाळेतील हजारो स्त्रीयांना मुक्त केले. त्या दुराचारी नरकासूरवधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदिवासातील असंख्य कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत,
हे जाणून कृष्णाने त्यांचा रक्षक पालक होऊन त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या वेळी नरकासुराच्या बंदीशाळेतून मुक्त झालेल्या त्या लोकांनी स्वत:च्या मुक्तीचा आनंद दारी सडा, संमार्जन करून, दारात सुंदर रांगोळ्या काढून, दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला. त्याचे प्रतीक असतो नरक चतुर्दशीचा तिसरा दिवा.