अमरावती – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने सध्या देशभरात रान उठले आहे. ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोललो नसून गावातील गुंडाबाबत बोललो आहे’, असा दावा पटोले यांनी केला. त्यानंतर भाजपाने काल राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलने, निदर्शने करुन नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध केला.
यावरूनच भाजपचे माजी कृषि मंत्री अनिल बोंडे यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले,’सोनिया गांधी यांना खुष करण्यासाठी मोदी वर किती भुंकायचे याची शर्यत काँग्रेसमध्ये लागली आहे. नाना ने तर हद्दच केली. मी मालकीनीचा सगळ्यात प्रमाणिक कुत्रा आहे म्हणून दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली,’ असं वक्तव्य अनिल बोंडे यांनी केलं आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘नानांनी लक्षात ठेवाव शाहिस्ते खानाची नुसती बोटंच छाटली होती तुझा पंजाच छाटला जाईल. उगीचच गमज्या मारू नको. अमरावतीवरून पोरं निघाले आहेत पंजा सांभाळून ठेव.”
दरम्यान, ‘‘मी एवढ्या वर्षांच्या राजकारणात एकही शाळा काढली नाही किंवा ठेकेदारी केली नाही. जो आला, त्याला वाटत गेलो, म्हणूनच मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले नाही,’’ असे नाना पटोले म्हणाले. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली. त्यावर पटोलेंनी स्पष्टीकरण देखील दिले आहे.