सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी राजकारणात यशस्वी प्रवेश करत विजयाचा गुलाल उधळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली. विरोधी शेतकरी विकास पॅनलल 6 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
रोहित पाटील यांनी निवडणुकीत केलेला प्रचार चर्चेचा विषय ठरला होता. या निवडणुकीनंतर “माझा बाप तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही” असे त्यांनी म्हटले होते. त्यांचे हे वक्तव्य राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या भावनिक सादेला जनतेने चांगला प्रतिसाद दिला असून विजय मिळवून दिला आहे. यानिमित्ताने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीला बोलताना रोहित पाटील यांनीआपल्या विजयावर प्रतिक्रिया दिली. रोहित पाटील म्हणाले, निवडणुकीत विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं, माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही” असे त्यांनी म्हटले आहे.