नवी दिल्ली – कुतुब मिनारमध्ये नमाज पठणाला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी दिल्ली वक्फ बोर्डाने केली आहे. कुतुबमिनारमधील मशिदीमध्ये नमाज पठण केले जात होते. मात्र भारतीय पुरातत्व विभागाने ते थांबवले होते, असेही वक्फ बोर्डाने म्हटले आहे. कुतुब मिनारच्या आवारातील कुतुब उल इस्लाम मशिदीमध्ये नमाज पठणाला परवानगी द्यावी अशी मागणी करणारे पत्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष अमानतुल्ला खान यांनी पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना गेल्या आठवड्यात पाठवले आहे.
पुरातत्व विभागाने कुतुब मिनार ताब्यात घेईपर्यंत या मशिदीमध्ये दिवसात पाचवेळा नमाज पठण होत होते. ही प्रथा कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहिली होती, असेही त्या पत्रात म्हटले आहे. पुरातत्व विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांनी नमाज पठणाची प्रथा थांबवली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी केली आहे. वक्फ बोर्डाने नियुक्त केलेले मशिदीचे इमाम मौलवी शेर मोहम्मद यांनी 7 मे रोजी पुरातत्व विभागाला पत्रही लिहिले होते.
कुतुब मिनारमधील हिंदू आणि जैन देवस्थानांचे पुनरुजीवन करण्यात यावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होऊ लागली आहे. त्या पार्श्वभुमीवर वक्फ बोर्डाने नमाज पठणाची मागणी केली आहे. मात्र या मागणीवर पुरातत्व विभागाकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
मात्र त्याचवेळी कुतुबमिनारमधील हिंदू आणि जैन देवस्थानांचे पुनरुजीवन करण्यासाठी दिल्लीतील न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेला पुरातत्व विभागाने विरोध केला आहे. हे ठिकाण प्रार्थनास्थळ नाही. या स्थानाच्या सध्याच्या स्थितीमध्ये बदल केला जाऊ शकत नाही, असे पुरातत्व विभागाने म्हटले आहे.