चिंचवड (वार्ताहर) – शहरात करोना दिवसेंदिवस थैमान घालत आहे. रुग्णांच्या संख्येबरोबरच मृतांची संख्यादेखील वाढत आहे. त्यात सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढत असल्याने डेंग्यू, टायफाईड, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या आजारांना नागरिक बळी पडतात. अशा स्थितीमध्ये चिंचवड परिसरातील नाल्याचे मैलामिश्रित पाणी शुद्धीकरण न करताच पवना नदीत सोडले जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
चिंचवड येथील सुदर्शननगर, गावडे कॉलनी, गणेशनगर, पारिजात बन, इंद्रप्रस्थ गृहसंकुल, गोलांडे इस्टेट या परिसरात शैकडो गृहसंकुले आहेत. तसेच शैक्षणिक संकुलेदेखील आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु नाल्यातून सांडपाणी, मैलामिश्रित पाणी सोडण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाकाला रूमाल बांधूनच प्रवास करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांना याची त्रास होत असल्याने त्यांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. तसेच श्वसानासाठी त्रास होत आहे. या नाल्यातच भुयारी गटराद्वारे मैलामिश्रित पाणी गृहसंकुलातून एकत्रित करून त्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट पवना नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे पवित्र पवना नदी दूषित होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या नाल्याची पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नाव न सांगण्याच्या अटीवर स्थानिक नागरिकांनी केली आहे. अधीच करोनाने जगणे मुश्कील केले आहे. त्यात दूषित वातावरणामुळे साथीच्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ आली तर काय होणार अशी भीती नागरिकांना सतावत आहे.
लोकप्रतिनिधींचा कानाडोळा
या परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नाल्याची साफसफाई करून घेणे गरजेचे आहे. जास्त पाऊस झाला तर नाला तुंबून दूषित पाणी नागरिकांच्या घरादारांमध्ये शिरू शकते. परंतु लोकप्रतिनिधी याकडे कानाडोळा करत असल्याच्या तक्रारी परिसरातील ज्येष्ठ नागरिक करत आहेत.
यंदा नाला सफाईविना
दरवर्षी पावसाळापूर्वीच्या कामात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नालेसफाई करण्यात येत असते. परंतु या वर्षी उन्हाळ्यात येथील नाल्याची साफसफाई करण्यात आली नाही. त्यामुळे नाल्याच्या पात्रात गाळ, प्लॅस्टिक, कचरा, टाकाऊ वस्तू साठल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही. परिणामी पाण्याला दुर्गंधी येत आहे. नाल्याची साफसफाई, त्यातील गाळाची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.