आळंदी – तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीचे पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. एकादशी, यात्रा, सोहळ्यांच्यावेळी आलेल्या वारकऱ्यांना, भाविकांना याच प्रदूषित पाण्यात स्नान करावे लागत आहे; तर काही भाविक हे भक्तीभावाने हेच पाणी तीर्थ म्हणून प्राशन करत असतात.
“ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालासे कळस।।’ या संत वचनाप्रमाणे वारकरी सांप्रदायाच्या इमारतीचे संत ज्ञानेश्वर महाराज हे पाया आहेत. तर जगद्गुरू तुकाराम महाराज हे कळस आहेत. त्यामुळे राज्यभरातून लाखो भाविक हे ज्ञानोबा तुकोबांच्या दर्शनासाठी आळंदी-देहूला येत असतात. आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा आणि कार्तिकी एकादशी या दोन वेळी अडीच ते तीन लाख भाविक येत असतात. तसेच महिन्याच्या एकादशी आणि सुट्टीच्या वेळीही भाविक मोठ्या संख्येने या देवस्थानांना भेट देतात.
तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी घाट –
अशावेळी भाविक तीर्थक्षेत्री आल्यानंतर इंद्रायणी तीर्थात स्नान आणि माउलींचे दर्शन घेणे हा वारकरी संप्रदायातील नियम आहे. तसेच यात्रेच्या वेळी चार ते पाच दिवस लाखो भाविक हे आळंदीत मुक्कामी असतात त्यावेळी त्यांची स्नानाची व्यवस्था ही इंद्रायणी नदीत होत असते; मात्र गेल्या काही वर्षांमध्ये इंद्रायणीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कारखान्यांचे केमिकल मिश्रित पाणी. हे थेट इंद्रायणीत सोडण्यात आले आहे. तर काही ठिकाणचे गावांचे तसेच शहरातील सांडपाणी हे कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडण्यात आले आहे. याचा वारकऱ्यांना मोठा त्रास होत आहे.
इंद्रायणीत आंघोळ केल्यानंतर तसेच पाणी प्राशन केल्यानंतर अनेक भाविकांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, त्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी मंदीरासमोर साखळी उपोषण सुरू आहे.
इंद्रायणीच्या बंधाऱ्यावरून पडत असलेल्या केमिकल मिश्रित पाण्याचा झालेला फेस..
महाराष्ट्र दिनी सुट्टी असल्यामुळे हजारो भाविक हे तीर्थक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी अनेक भाविक हे इंद्रायणीन स्नान करत होते, तर काही भाविक हे हात पाय धुत होते. तसेच काही भाविक हे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करत होते. मात्र हे पाणी प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाले असून ते पिण्यास योग्य नाही. हे पाणी पिल्याने तसेच त्यामध्ये स्नान केल्यामुळे अनेक भाविकांना त्वचा रोगांच्या समस्या उद्भवत आहेत.
महिला वारकरी तीर्थ म्हणून इंद्रायणीचे पाणी पिताना
“इंद्रायणीचे पाणी पिऊ नका’ असे फलक आवश्यक –
आळंदीला आल्यानंतर भाविक इंद्रायणीत स्नान करतात तर काही जण हातपाय धुतात. काही भाविक हे श्रद्धेने हे पाणी तीर्थ म्हणून पितात; मात्र सध्या हे पाणी पिण्यायोग्य नाहीच तर स्नानासाठीही योग्य नाही. या पाण्यामुळे भाविक, वारकऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे जोपर्यंत इंद्रायणीचे पाणी प्रदूषणमुक्त होत नाही, तोवर आळंदी नगरपरिषदेने इंद्रायणी घाटावर दर्शनी भागावार ‘इंद्रायणीचे पाणी पिऊ नका’ असे फलक लावणे आवश्यक आहे.
“इंद्रायणी उगम ते संगमापर्यंत सर्व गावे, पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील कंपन्यांनी एसटीपी प्रकल्प उभारून पाण्यावर प्रक्रिया करूनच ते पाणी इंद्रायणी नदीत सोडावे. प्रशासनाने इंद्रायणी प्रदूषणास कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करावी. जोपर्यंत इंद्रायणी प्रदूषण मुक्तीबाबत प्रशासन ठोस निर्णय घेऊन प्रत्यक्ष कृतीत दाखवत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरु राहील. तसेच पुढे हा इंद्रायणी प्रदूषणमुक्तीचा लढा अधिक तीव्र होणार असून राज्यभरातील भाविक वारकरी उपोषण करतील. तरीही प्रशासनाने दखल न घेतल्यास इंद्रायणीत जलसमाधी आंदोलन केले जाईल.” – विठ्ठल शिंदे, (इंद्रायणी सेवा फाउंडेशन)
आळंदी येथिल संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदीरासमोर सुरु असलेले साखळी उपोषण
दरम्यान, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे पासून इंद्रायणी प्रदुषण मुक्तीसाठी साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. आळंदीतील बहुतांश सर्वच ग्रामस्थ, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, यांनी या उपोषणास पाठिंबा दर्शवला आहे. उपोषणादरम्यान सकळी ज्ञानेश्वरी पारायण तर सायंकाळी हरिपाठ म्हणला जातो. इंद्रायणी प्रदुषण मुक्तीसाठी प्रत्येक वारकऱ्यांने या उपोषणाला पाठिंबा देऊन सहभागी होण्याचे आवाहन उपोषणकर्त्यांनी केले आहे.