केळघर – पुनवडी (ता. जावळी) येथील करोनाबाधितांच्या संख्येत रात्री उशिरा तब्बल 22 ने वाढ झाली असून येथील एकूण बधितांची संख्या 113 झाली आहे. तर आजपर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
पुनवडी येथील बाधितांची संख्या वाढू लागल्याने साखळी खंडित करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करून असून उद्यापर्यंत गावातील सर्व नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेणार असल्याची माहिती प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिली. पुनवडी येथील बाधितांच्या संख्येने शंभरी पार केल्याने चिंता व्यक्त होत असून दिवसेंदिवस आकडा वाढत चालल्याने साखळी खंडित होण्यास अडचणी येत आहेत.
प्रांताधिकारी श्री. मुल्ला यांनी पुनवडी येथे आज भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना कवारे, डॉ. विशाखा कदम, आरोग्य सहायक विशाल रेळेकर, सतीश मर्ढेकर, तलाठी संदीप ढाकणे, ग्रामसेवक डी. एम. यादव, आरोग्य सेवक मोहन शिंदे, आस्मा शेख, गीतांजली अडागळे उपस्थित होते. पुनवडी येथील रोजच्या वाढत्या आकड्याने पुनवडीसह परिसरात भीतीचे वातावरण असून ही वाढती साखळी थांबवण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आज भणंग व पुनवडी येथे ग्रामस्थांचे घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले. पुनवडी येथे 152 व भणंग 106 असे एकूण 258 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
उद्यापर्यंत गावातील सर्वच नागरिकांचे स्त्राव घेण्याची सूचना यावेळी श्री. मुल्ला यांनी केली.पुनवडी येथील आकडा शंभरच्या पार गेल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. प्रशासन साखळी तोडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असूनही या छोट्याशा गावात एवढ्या मोठ्या संख्येने बाधित आढळून येत असल्याने तालुक्यातील जनतेच्या काळजाचा ठोका चुकत आहे.
सध्या केळघर परिसरात भात लागण अंतिम टप्यात आली आहे. परंतु, पुनवडी येथील भात शेती तशीच पडून आहे. सध्या पुनवडीत 113 करोनाबाधित रुग्ण आढळल्याने संपूर्ण गावच “हाय रिस्क’ संपर्कात आल्याने गावातील सर्व शेतीची कामे तशीच पडून आहेत. प्रमुख पीक असणारी भातशेती पूर्ण वाया जाणार असल्याने अगोदरच तणावामध्ये असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असून भविष्यात खायचे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
पुनवडी येथील वाढलेली साखळी खंडित करण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत असून भणंग व पुनवडी या दोन ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे. उर्वरीत सर्व ग्रामस्थांचे स्त्रावाचे नमुने घेण्याचे काम उद्या पूर्ण होईल.
डॉ. भगवानराव मोहिते
तालुका आरोग्य अधिकारी