पाथर्डी,(प्रतिनिधी): संत वामनभाऊंनी आयुष्यभर बैलगाडीतून प्रवास करून गावोगावी जाऊन लोकांना परमार्थाची शिकवण देत समाज सुधारण्याचे काम केले. कधी बुवाबाजी अथवा भोंदूगिरी न करता भाऊंनी अडाणी समाजाची उन्नतीसाठी कायम सर्वत्र भ्रमंती केली. नुसता उपदेश नाही दिला तर आपल्या कृतीतून महान कार्यामुळेच या संतांना आजही समाज विसरलेला नाही. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे हजारो ठिकाणी मोठ्या भक्तीभावाने भाऊ- बाबांची पुण्यतिथी साजरी करतात, असे प्रतिपादन गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी व्यक्त केले.
श्री संत वामनभाऊ व भगवानबाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पाथर्डी आगारातील कर्मचाऱ्यांच्या वतीने गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आगारप्रमुख आरिफ पटेल, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे, एसटी बँकेचे संचालक दत्तात्रय खेडकर, दिगंबर आव्हाड, डी.जी. अकोलकर, बाळासाहेब सोनटक्के, मेजर सतीश शिरसाट, मोहन महाराज सुडके, प्रा.सुभाष शेकडे उपस्थित होते.
महंत विठ्ठल महाराज यांची रथातून पाथर्डी शहरातील प्रमुख चौकातून वाजतगाजत आणि फटाक्याच्या आतिष बाजीत मिरवणूक काढण्यात आली. काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांकडून दरवर्षी पुण्यतिथी साजरी करण्यात येते. यंदाचे हे पुण्यतिथीचे नववे वर्ष होते. अंबादास शिरसाट, माऊली हजारे, अलिम पठाण यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.