जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून दिला इशारा
नेवासा – तत्कालीन जलसंपदामंत्री आमदार बच्चू कडू यांनी जायकवाडी धरणात नेवासा तालुक्यातील सुरेगाव गंगा येथील बुडीत क्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करून भूसंपादन मंजुरीसाठी प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले होते. या प्रकरणाला प्रशासकीय मान्यता देण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून विलंब झाल्याने आ. कडू यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी तत्कालीन जलसंपदामंत्री कडू यांच्याकडे जायकवाडी धरण बुडीत क्षेत्रात असणाऱ्या शेतजमिनीबाबत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दोन वेळा सुनावणी लावून जलसंपदा व गोदावरी महामंडळाकडून हे क्षेत्र बुडीत असल्याचा प्रस्ताव भूसंपादन प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. याबाबत भूसंपादन प्रक्रियाबाबत असणाऱ्या सर्व विभागांची ना हरकत आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता देण्यास टाळाटाळ होत होती.
या प्रकरणाबाबत पोटे व प्रहार श्रीरामपूर विधानसभा प्रमुख आप्पासाहेब ढूस धरणग्रस्त शेतकऱ्यांसह अचलपूर येथे आ. कडू यांची भेट घेऊन हकीगत सांगितल्यानंतर आ. कडू यांनी कागदपत्रे प्रस्ताव तपासून जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून याबाबत विचारणा केली.