दोन गटांत वादविवाद : पोलीस अधिकाऱ्यांनी वातावरण केले शांत
शेवगाव – येथील एका गल्लीत गोमांस विक्रीसाठी आल्याच्या संशयावरून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटांत वादविवाद होऊन काल मंगळवारी रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात फिर्याद दाखल करण्याबाबत रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरु होता. सर्व गोधळानंतर रात्री उशिरा गोपनिय शाखेचे सहाय्यक संतोष वाघ यांनी सरकारतर्फे शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
मंगळवारी दुपारी सहकारी शाम गुंजाळसह आम्ही शहरात पेट्रोलिंग करीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलो. तेव्हा खाटीक गल्लीत अचानक धावपळ व आरडाओरडा चालू होता. तेथे गेलो असता काही घरांमध्ये गोमांस आले असल्याचे संशयावरून दोन गटांत वादविवाद करुन धक्काबुक्की करताना दिसून आले. यावेळी परिस्थिती लक्षात घेत तत्काळ पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना कळवले. त्यानंतर मदतीसाठी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारीही लगेच आले. पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, आशिष शेळके, उपनिरीक्षक नीरज बोकील व इतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करुन जमाव पांगवला.
वादविवाद करणारे शिवम देविदास घोडेचोर (देवसडे, ता.नेवासा), तुषार भातंबरे (रा. चिलेखनवाडी, ता. नेवासा), बंटी म्हस्के, सचिन पन्हाळे ( दोघे रा. शेवगाव ) व त्यांचे तीन ते चार अनोळखी साथीदार त्यांचे नाव पत्ता समजला नाही. हे तेथे गोमांस आणले आहे, याचा शोध घेण्यासाठी आले होते. त्यावेळी सदर ठिकाणी चार ते पाच अन्य समाजाचे अनोळखी इसम होते. ते आपसात वाद विवाद करत होते. यातील एका गटाचे इसम म्हणत होते की, आमचे गल्लीत तुम्ही विनाकारण का आले, या कारणावरुन आपसात वादविवाद करून धक्काबुक्की करताना मिळून आले. त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या भंगसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना समजपत्र देऊन सोडण्यात आले .
आज शांतता कमिटीची बैठक
या वादाची माहिती मिळताच उपअधीक्षक सुनील पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी शेवगावात येऊन घडल्या प्रकाराची माहिती घेऊन सूचना केल्या. दोन्ही गटांचे समुपदेशन केल्याने सध्या वातावरण शांत झाले. दरम्यान उद्या गुरुवारी संध्याकाळी पाचला शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.