अकोले – निळवंडेसाठी अकोलेच्या जनेतेचे योगदान मोठे आहे. निळवंडे धरणातून पुन्हा पाणी सुटले आहे. माजीमंत्री मधुकरराव पिचड व मला आदर्श पुनर्वसनाचे काम करून निळवंडेचे काम पूर्णत्वास नेण्याचे भाग्य लाभले. यातच निर्मितीचा आनंद आम्हाला आहे.कोनशिलेवर नाव नसले अथवा उद्घाटनाला नसल्याने काही होत नाही. तुम्हाला सर्व माहिती आहे, असे म्हणत निळवंडे धरणाच्या लोकार्पण कार्यक्रमावर आ.बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री विखे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
अकोले शहरातील एका खासगी कार्यक्रमानिमित्त आ.बाळासाहेब थोरात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ.सत्यजित तांबे, जुन्नरचे माजी आ.शरद सोनवणे, ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम गायकर, उपाध्यक्ष सुनीता भांगरे, कॉ. डॉ.अजित नवले, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, मिनानाथ पांडे, कचरू शेटे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कैलास वाकचौरे उपस्थित होते.
आ.थोरात म्हणाले, निळवंडेची तिसऱ्यादां चाचणी झाली. तुमच्या अकोलेकरांच्या सहकार्यामुळेच निळवंडे व कालवे हे पूर्ण झाले व होत आहे, याची जाणीव आहे. प्रकल्पग्रस्तांना आमच्याकडे सामावून घेतले एवढेच नाही तर आज प्रकल्पग्रस्त नागरीक आमच्याकडे सोसायटीचा चेअरमन झाला आहे ही आनंदाचीच बाब आहे.तुमच्या सहकार्यानेच प्रकल्प पुर्णत्वास गेला असल्याने तुमचेही आभार मानलेच पाहिजे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या भावनेनेबरोबर मी आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य आहे. मराठा समाजाच्या मुलांची काय परिस्थिती आहे हे सरकारने जाणून घेतले पाहिजे. माझाही पाठिंबा या आरक्षण लढ्याला असल्याचे सांगितले.