आठ-आठ दिवस शिक्षक गायब; शाळेला कुलूप
जनार्दन लांडे पाटील
शेवगाव – ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या एक किंवा दोन शिक्षकी अनेक शाळेवर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तेथील विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण रामभरोसे झाल्याचे चित्र समोर आले आहे.
दुर्गम भागातील वाडीवस्तीवर राहणारे मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी सरकारने सन 1992 साली खडू फळा योजनेंतर्गत दुर्गम भागातील वाडीवस्तीवर वस्ती शाळा सुरू केल्या. एक ते 10 विद्यार्थी यांच्यासाठी एक किंवा दोन शिक्षकांची नेमणूक केली.
सुरवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील मोठ्या शाळेपेक्षा वाडीवस्तीवरील शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक असू शकते हे यातून स्पष्ट झाले. अशा शाळातील विद्यार्थी विविध स्पर्धेत चमकले देखील, मात्र अनेक वाडीवस्तीवरील लमाण तांडयावरील शिक्षकांवर तेथील भौगोलिक स्थितीमुळे नियंत्रण ठेवणे दुर्लक्षित झाले. नेमका त्याचा लाभ या शिक्षकांनी घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यातील शैक्षणिक गुणवत्ता घसरली.
काही शिक्षकांनी आपआपल्या सोईनुसार या वाडीवस्तीवरील शाळेत वर्णी लावून घेतली. ज्या ठिकाणी 15 पर्यंत विद्यार्थी पटसंख्या आहे. त्याठिकाणी दोन शिक्षक नेमणूकीस आहेत.परंतू एकच शिक्षक शाळेत हजर असतो.कोणी अधिकारी आल्यास वा विचारणा झाल्यास दुसऱ्याचा किरकोळ रजेचा अर्ज त्यांच्याकडे असतो. हे दोघे शिक्षक आठ-आठ दिवसाच्या पाळ्या लावून शाळा चालवितांना आढळले आहेत.
लाडजळगाव शिवारातील जय अंबिका या वस्तीशाळेवरील शिक्षकांनी तर कहर केला आहे.ही एक शिक्षकी शाळा असून आठ-आठ दिवस या शाळेला कुलूप असते. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून या शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यानी येथील मुलांच्या शिक्षणाचा बट्याबोळ केला आहे. त्यात सुधारणा व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
शेकटे खुर्द ही दोन शिक्षकी शाळा आहे, परुं येथे एकच शिक्षक हजर असतात. दुसऱ्या शिक्षकाचे ढोरजळगाव केंद्रात समायोजन केले असल्याची माहिती मिळाली. बोधेगाव केंद्रांतर्गत कोणत्याही शाळेवर समायोजन करणे आवश्यक व योग्य होते. मात्र, शिक्षण विभागाने त्यांचे थेट नगर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या शाळेत समायोजन केले आहे. संबंधित शिक्षक नगरला राहतात म्हणून त्यांच्या सोईनुसार समायोजन करण्यात आल्याचे समजले.
आमचे वस्तीवर इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे 10 ते 12 विद्यार्थी आहेत, ते शिक्षणासाठी बोधेगावला जातात. कारण वस्तीवरील शाळा चार-चार दिवस बंद असते, आणि शिक्षक मुलांना शिकवतच नाहीत. शिक्षण विभागाने याची दखल घ्यावी.
संभाजी तुळशिराम लादे, रहिवासी जय अंबिका वस्ती.