मुंबई – ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाच्या हक्कभंग नोटिशीला उत्तर दिल आहे. “माझे वक्तव्य केवळ एका गटापुरते मर्यादीत आहे,’ असा दावा राऊत यांनी केला आहे.
राऊत याप्रकरणी म्हणाले, मी तेव्हा उत्तर देऊ शकलो नाही. दोन दिवस विधीमंडळाला सुट्टी होती. त्यामुळे आज मी उत्तर दिले आहे. मी विधीमंडळाचा अपमान, हक्कभंग होईल असे मी विधान केलेले नाही. मी मुंबईच्या बाहेर असताना या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. हे वक्तव्य विधीमंडळातील सदस्यांचा अवमान करण्यासाठी मी केले नाही. ते एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे. हे कृपया लक्षात घ्यावे तरीही या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी, अशी विनंतीही त्यांनी प्रधान सचिवाकडे केली आहे.
महत्वाची बाब म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या हक्कभंग समितीमध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, तर यामध्ये भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेचे (शिंदे गट) मिळून 14 आमदारांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
दुखविण्याचा हेतू नव्हता
विधीमंडळाच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता आणि नसेल. मी केलेले वक्तव्य तुम्ही तपासून पाहावे असेही राऊत यांनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत एक पत्र विधीमंडळाच्या प्रधान सचिवांच्या नावे दिले आहे.