मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. राज्यात अघोषित आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण करून पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे, असा आरोप भाजपने राज्य सरकारवर केला.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, राज्यात अघोषित आणीबाणीसदृश परिस्थिती आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण केली असून, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करून त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलू नये, अशी स्थिती निर्माण केली जात असल्याचे भाजपने म्हटले आहे.
पत्रकार राहुल कुलकर्णी प्रकरण, ‘टाइम्स नाऊ’ या वाहिनीवर कारवाई प्रकरण तसेच काल रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना साडेबारा तास चौकशीसाठी ठाण्यात बसविण्यात आले. टीव्हीवरील एका चर्चात्मक कार्यक्रमाची चौकशी करण्यासाठी साडेबारा तास बसवून ठेवणे, यातून केवळ पत्रकारांच्या मनात दहशत निर्माण करणे हा हेतू दिसून येतो, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
तसेच अनेक गंभीर गुन्ह्यात आरोपींची चौकशी करण्याचे धाडस सरकार दाखवू शकले नाही. सरकारविरोधात सोशल मीडियावर लिहणाऱ्यांवर सुद्धा हे सरकार मुस्कटदाबी करत आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येत आहे. दुसरीकडे वृत्तपत्र वितरणावर देखील बंदी टाकली आहे. याबाबत राज्य सरकारला जाब विचारावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांकडे केली आहे.
माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा !
मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांची आज भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी माझे सहकारी विनोद तावडेजी, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, मंगलप्रभात लोढाजी उपस्थित होते. pic.twitter.com/VJMfWc6a7h— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 28, 2020