प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 -ढगफुटी सदृश पाऊस पडल्याने शहरातील बहुतांश वस्त्यांमध्ये पाणी शिरले. महापालिकेच्या आपत्तीव्यवस्थापन विभागाच्या प्रमुखांनी मात्र “असे फारसे काही झाले नसून, सगळे एकदम “ओक्के’ आहे’ असे उत्तर दिले आहे.
रविवारी सायंकाळी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सुमारे एक तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलेच परंतु वस्त्यांमध्येही पाणी शिरले. यातील काही वस्त्या या कॅनॉलच्या बाजूला उतारावर असल्याने याठिकाणी पावसाचे पाणी घरांमध्ये शिरतेच. त्यामुळे येथे आपत्कालिन स्थिती पावसाळ्यात कायमच उद्भवते. असे असतानाही “असे फारसे काही झाले नसून, सगळे एकदम “ओक्के’ आहे’ असे उत्तर आपत्तीव्यवस्थापन प्रमुखांनी दिले.
सिंहगड रस्त्यावरील दत्तवाडी, राजेंद्रनगर, हनुमान नगर, येरवडा, कात्रजमधील काही भाग, टांगेवाले कॉलनी, मोरे वस्ती, कोथरूड मधील काही भाग, बीटी कवडे रोड, पाषाण, रामनदी परिसर, वानवडी, पद्मावती, मार्केटयार्ड, सातारा रस्ता, विमाननगर या भागांमध्ये मोठ्याप्रमाणात रस्त्यांवर पाणी साठले आणि बैठ्या घरांमध्ये पाणी शिरले.
सहकारनगर भागातील टांगेवाले कॉलनी आणि मोरेवस्ती येथे पाणी शिरले. मोरे वस्तीतील काही कुटुंबांना खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या वि. स. खांडेकर शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. याशिवाय राजेंद्रनगर, दत्तवाडी, हनुमान नगर दोन-तीन ठिकाणी पाणी आहे. महापालिकेचे कर्मचारी तेथे पोहोचले आणि त्यांनी आपत्कालिन परिस्थिती हाताळल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, कोणीही मदतकार्याला पोहोचले नाही अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
आंबिल ओढा परिसरात काही झाले नाही, असा दावा करण्यात येत असला तरी ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने, त्यापासून पुराचा धोका असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे आहे. सुमारे दीड तासाने पाऊस थांबला असला तरी अशाप्रकारे पुन्हा परिस्थिती उद्भवू शकते असे तेथील स्थानिकांचे म्हणणे आहे. येथे दोन ठिकाणी उताराच्या वस्त्यांमध्ये कायमच पाणी शिरते.
कात्रज, धनकवडीत पुराची तक्रार
कात्रज, धनकवडी परिसरासह पर्वती भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अंबिल ओढ्याला पूर आल्याची तक्रार तेथील स्थानिकांनी केली आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या मनमानी कारभारामुळे येथील 22 कुटुंबियांचा जीव धोक्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या चुकीच्या कामामुळे येथील 11 ते 12 घरांत सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ओढ्याचे पाणी शिरले आहे, अशी तक्रार तेथील काही नागरिकांनी केली आहे.
…थेट मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी
या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहे. येथील नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या जीवितास धोका झाला तर स्थानिक आमदार, खासदार आणि तत्कालीन नगरसेवक, पालिका आयुक्त यांच्या वर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत, रात्री पावसाचा जोर वाढल्यास तीन वर्षांपूर्वी जशी परिस्थिती झाली होती तशी स्थिती होण्याची शक्यता आहे, असे तेथील नागरिकांनी सांगितले.
कुठेच काही पाणी गेले नाही. जेथे माहिती मिळाली होती, तेथे क्षेत्रीय आयुक्त कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.
– गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख, पुणे महापालिका