राहण्या योग्य शहरासाठी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन
पुणे – देशातील राहण्यायोग्य शहरांमध्ये (ईझ ऑफ लिव्हिंग इंडेक्स) पुण्याचे मानांकन टिकविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पुणेकरांना साकडे घालण्यात आले आहे. मागील वर्षी पुणे देशात पहिल्या क्रमांकावर होते. मात्र, या वर्षी लोकसहभागात पुणे मागे पडले आहे. त्यामुळे शहराचा प्रथम क्रमांक टिकविण्यासाठी प्रशासकाडून कंबर कसली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ आणि अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत पुणेकरांना यासाठी आपले मत नोंदविण्याचे आवाहन केले.
केंद्र सरकारच्या सर्वेक्षणात पुणे शहराचा 2018-19 मध्ये देशभरात सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरांमध्ये पहिला क्रमांक आला होता. विविध सरकारी-निमसरकारी संस्थांची कार्यपद्धती, शहरातील पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक यासारख्या वेगवेगळ्या निकषांवर देशातील राहण्यायोग्य शहरांची स्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रथमच अशा स्वरूपाचे सर्वेक्षण घेण्यात आले होते. त्याच धर्तीवर केंद्रीय मंत्रालयाने यंदा पहिल्यांदाच स्थानिक नागरिकांचाही अभिप्राय नोंदविणे या स्पर्धेसाठी बंधनकारक केले. त्यासाठी लोकसंख्येच्या 1 टक्के लोकांनी अभिप्राय देणे बंधनकारक आहे.
तर आता पर्यंत शहरातील आतापर्यंत सुमारे साडेसात हजार पुणेकरांनी या सर्वेक्षणात आपला अभिप्राय नोंदविला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पुणेकरांनी https://eol2019.org/Citizenfeedback या वेबसाईटवर आपला अभिप्राय नोंदवावा असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.