मुंबई – लॉकडाऊनमध्ये थांबलेली मुंबई पुन्हा अनलॉक करण्याच्या दिशेने टप्प्याटप्प्याने सुरुवात होत आहे. मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी मुंबई लोकल पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, ही सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
आज (15 जून) पहाटे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, विरार, तर मध्य रेल्वेवरील ठाणे, सीएसएमटी यासारख्या स्थानकांवरून लोकल सुटल्या. दिवसभराबत मध्य रेल्वेवर 200, तर पश्चिम रेल्वेवर 130 लोकलच्या फेऱ्या झाल्याचे समजते.
मुंबईतील लोकल सुरू करावी, याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुंबईची लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकलचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणारे म्हणजेच पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई आणि इतर कर्मचारी, पत्रकार अशा काही ठराविक कर्मचाऱ्यांनाच करता येणार आहे.
सर्वसामान्य प्रवाशांना अद्याप लोकलने प्रवास करता येणार नाही. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर निवडलेल्या उपनगरी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयमुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.