मुंबई – मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील निर्बंध हटवण्याबाबतचे नवे परिपत्रक जारी करत मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील रात्रीची संचारबंदी हटवण्याचा निर्णय घेत त्याचे आदेश मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीदिले.
निर्बध हटवल्यानंतर मुंबईतील समुद्र किनारे, गार्डन, पार्क नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहेत. मुंबईतील मनोरंजन पार्क, थीम पार्क 50टक्क्यांच्या क्षमतेने सुरू राहणार आहेत. स्वीमिंग पूल, वॉटर पार्क्स 50 टक्क्यांच्या क्षमतेने सुरू ठेवता येतील. रेस्टॉरंट्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे नियमित वेळेनुसार 50टक्क्यांच्या क्षमतेने सुरू राहाणार आहेत. भजने आणि इतर अनेक स्थानिक सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम हॉल किंवा मंडपांमध्ये 50 टक्क्यांच्या क्षमतेने सुरू राहणार आहेत.
लग्न समारंभासाठी मोकळ्या मैदानांमध्ये 25 टक्के क्षमतेने आणि हॉलमध्ये 200 जणांना उपस्थित करण्याची परवानगी असून खेळ, घोड्यांच्या शर्यतींसह इतर अनेक कार्यक्रम 25टक्क्यांच्या क्षमतेने सुरू राहतील. हे 25 टक्के बसण्याच्या जागेनुसार मोजण्यात येतील. या कार्यक्रमांना उभ्याने उपस्थित राहण्यास परवानगी नसेल. तसेच फिरत्या लोकांनाही परवानगी नसेल.