नारायणगाव – शॉर्ट सर्किटमुळे आग लागून ११ एकर ऊस व ट्रॅक्टर जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी (दि.१) सकाळी साडे दहाच्या सुमारास हिवरे तर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथे घडली आहे. यामध्ये शांताराम धोंडीभाऊ कुरकुटे, मोहन धोंडीभाऊ कुरकुटे, रामजी कोंडाजी भोर, शहाजी तुकाराम भोर, बारकू ठकाजी भोर, सुशील सोपान खंडागळे, अर्जुन बाळू भोर, विठ्ठल बाळू भोर या शेतकऱ्यांचे १८ ते २० लाख रुपयांच्या ऊसाचे नुकसान झाले आहे.
ऊसाला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर अमित रोहिदास भोर या शेतकऱ्याने आग पसरू नये यासाठी उसाच्या मध्ये रोटावेटर घालण्याचा प्रयत्न केला. परंतु हवेमुळे ऊसाला लागलेली आग सर्वत्र पसरली व त्यामध्ये सात लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर जळून खाक झाला. यावेळी वीज वितरण कंपनीचे वायरमन शेतकऱ्यांना सहकार्य करीत नसून विजबिल भरण्यास विलंब झाल्यास विजेचे कनेक्शन तोडण्याची धमकी देतात, डीपी बंद करतात, वायरमन गावात राहत नसून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.
वीज वितरण कंपनीने जळून खाक झालेल्या ऊसाची नुकसान भरपाई लवकर न दिल्यास शेतकरी महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी सरपंच सोमेश्वर सोनवणे, उपसरपंच दिगंबर भोर, तलाठी कर्मचारी संजय गाडेकर, पोलीस पाटील विलास खोकराळे, शेतकरी बाबाजी भोर, गहीनाशेठ भोर, संजय भोर, दत्ता भोर, वसंत भोर, महादू मुळे, डी आर थोरात, रवींद्र थोरात, संदीप भोर, दशरथ भोर, सुखदेव भोर उपस्थित होते.