मुंबई – युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाईंनी मनसे, भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. गेल्या 30 वर्षात शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी अनेक आव्हाने पेलली आहेत. यंदाचेही आव्हान आम्ही पेलू. समोर कुणीही येवो, कुणाचीही युती व्हावी. तीन पक्ष काय 30 पक्ष एकत्र आले तरीही मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीर आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
शिवसेनेच्या निर्धार अभियानाची सुरुवात करण्यासाठी वरुण सरदेसाई सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. तुळजापूरमध्ये अंबाबाईचे दर्शन घेऊन त्यांनी अभियानाला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, वारंवार निवडणुका पुढे ढकलण्यापेक्षा निवडणुका जाहीर करा. मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरं जायला शिवसेना तयार आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही केवळ निवडणूक लढणार नाही तर जिंकणार आहोत, असा विश्वास सरदेसाईंनी व्यक्त केला.