मुंबई -राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसत आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुंबई टी-20 लीग स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन मिलिंद नार्वेकर यांनी आज गुरुवारी माहिती दिली. सद्यस्थिती पाहता अध्यक्ष विजय पाटील आणि मी पुढच्या सूचना येईपर्यंत मुंबई टी-20 लीग न घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती दिली.
देशातील नागरिक करोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. देशभरात ऑक्सिजन कमतरता तसेच लसींचा तुटवडा जाणवत आहे. अशावेळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे योग्य नाही. त्यामुळे परिस्थिती पुन्हा सामान्य होईपर्यंत स्पर्धेला स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनने सांगितले आहे.
आमच्या क्रिकेटपटूंनी या परिस्थितीत खेळावे, अशी आमची इच्छा नाही. आज लोकांचा जीव वाचवणे हे महत्त्वाचे आहे. परिस्थिती चांगली झाल्यावर आम्ही निश्चितपणे मुंबई लीग आयोजित करू, कृपया सहकार्य करा, असे एमसीएने म्हटले आहे.