मुंबई – मुंबईत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी योग्य वेळी एकत्र बसून निर्णय करतील. सरकारमध्ये आम्ही एकत्र असल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढू शकतो असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
मागील वेळी शिवसेनेबरोबर आमची लढाई आहे असं दाखवून भारतीय जनता पार्टीने त्यांची संख्या वाढवली. आता मुंबईकर भाजपला पाठिंबा देणार नाहीत. ती भीती असल्याने ते आपल्या पक्षाचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला आहे.
यावेळी जयंत पाटील यांनी सध्या सुरु असलेल्या निधी वाटपाच्या चर्चेवर देखील भाष्य केले. निधीवाटपात कोणाकडे दुर्लक्ष होतंय असं मला वाटत नाही. निधीच कमी आहे. कोरोनामुळे तिजोरीत पैसे नाहीत. त्यामुळे काही मर्यादा आहेत. ते सगळ्यांना माहित असल्याचे पाटील म्हणाले.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडील खात्यांना निधीची आवश्यकता आहे पण आपलं उत्पन्न मर्यादीत आहे. 12500 कोटी आपण वेतनावर खर्च करतो. त्यावर जो महसूल गोळा होतो दर महिन्याला तो वितरित करताना अत्यंत आवश्यकता असेल तिथे दिला जातो असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं.
अर्थसंकल्पात जे आहे ते देताना अर्थमंत्र्यांनी सगळ्यांना न्याय दिला आहे. पण आज दुर्दैवाने कोरोनामुळे आपल्याला मर्यादा आल्या असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.