मुंबई – राज्य शासनाने प्रस्ताव दिल्यास मुंबईतील लोकल रेल्वे सेवा पुन्हा एकदा सामान्य नागरिकांसाठी खुली करून देण्यात येईल असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नवी दिल्ली येथे बोलताना केलं. करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लोकल रेल्वे सेवा एप्रिल महिन्यामध्ये सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली होती. सध्या केवळ सरकारी कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल सेवा वापरण्याची मुभा आहे.
“मुंबई येथील लोकल रेल्वे सेवा सामान्य नागरिकांसाठी पुन्हा एकदा खुली करण्यास रेल्वे मंत्रालय परवानगी देईल. मात्र राज्य सरकारकडून याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. केंद्रीय रेल्वे मंत्रालय सामान्य नागरिकांच्या लोकल सेवा वापराच्या विरोधात नाही.” असं दानवे म्हणाले.
दरम्यान, मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी काही प्रवासी संघटनांनी केली होती. भाजप व मनसेने देखील याप्रश्नी राज्य सरकारवर दबाव टाकताना ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत किमान त्यांना तरी लोकलने प्रवास करू द्या अशी भूमिका घेतली आहे.
तत्पूर्वी, राज्य सरकारने सोमवारी सायंकाळी पॉझिटिव्हिटी दर कमी असणाऱ्या २५ जिल्हांमधील निर्बंध शिथिल केले. याद्वारे विविध व्यवसाय व दुकानांच्या वेळामध्ये वाढ करण्यात आली तसेच शॉपिंग मॉल्स उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
असं असलं तरी लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत बोलताना, ‘निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जात आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये लोकल सेवा सुरु करणं अवघड आहे.’ असं सांगितलं.
देशात करोना महासाथ येण्यापूर्वी मध्य व पश्चिम रेल्वे दररोज 75 लाखांहून अधिक प्रवाशांना लोकल रेल्वेसेवा देत होत.