मुंबई :- मुंबई शहर व उपनगरांतून वाहणाऱ्या मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, संरक्षक भिंत व सुशोभिकरणाचे सन 2005 पासून काम सुरू असून 2005 ते 2023 पर्यंतच्या संपूर्ण कामांची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.
मंत्री सामंत म्हणाले की, मिठी नदीच्या रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सुशोभिकरण हे काम एमएमआरडीए व मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत 2005 पासून सुरू आहे.
परंतु, हे काम अद्यापही समाधानकारक झाले नसून अद्यापपर्यंत हे काम पूर्ण का झाले नाही, तसेच या नदीतील किती गाळ काढला व तो गाळ कोठे टाकला याबाबतची संपूर्ण चौकशी उच्चस्तरीय समितीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी यावेळी दिली.
मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, संरक्षक भिंत व सुशोभिकरण याबाबतची लक्षवेधी सदस्य प्रसाद लाड यांनी मांडली होती.
या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, अनिल परब, जयंत पाटील, विलास पोतनीस, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.