पावसाळा सुरु झाला की वातावरणात खूप बदल होताना दिसतात. हवेतील दमटपणा हे वातावरणात संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते. थंडी -ताप, खोकला असे अनेक आजारांची साथ सुरु होते. त्याचबरोबर या दिवसात डोळे येण्याची साथ देखील पसरते. घरात एकाला डोळे आले तर संपूर्ण घरातल्या लोकांना हे इन्फेकशन होण्यास वेळ लागत नाही, तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात हा आजार पसरतो. जेंव्हा डोळ्यात जळजळ जाणवू लागते आणि त्याठिकाणी सूज येते, डोळे लाल होतात तेव्हा त्या त्रासाला कंजंक्टिवायटिस किंवा पिंक आय असेही म्हणतात. पावसाळ्यात कमी तापमान आणि आर्द्रतेमुळे जीवाणू, विषाणू आणि ऍलर्जीक घटकांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे ऍलर्जीक प्रतिक्रिया आणि कंजंक्टिवायटिस सारखे संक्रमण होते.
डोळे येण्याचे लक्षणे काय आहेत..?
१. डोळ्यातून पाणी येणे
२. डोळ्यात जळजळ होणे.
३. डोळे लालसर, गुलाबी होणे.
४. डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे जाणवणे.
५. सकाळी उठल्यावर पापण्यांच्या केसावर चिकट पदार्थ जमा होणे.
उपचार कसे केले जातात…?
जर तुम्हाला डोळ्याचा संसर्ग झाला असेल, तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नियमित औषधे घ्या. हा संसर्ग टाळण्यासाठी, आपले हात वारंवार धुवा, आपल्या हातांनी आपल्या डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नका आणि आपला परिसर स्वच्छ ठेवा. वेळोवेळी डोळे धुत रहा. जर बाहेर जाणे अधिक महत्त्वाचे असेल तर डार्क चष्मा घालून जा. ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांनी शाळा, कॉलेज किंवा ऑफिसमध्ये जावू नये. कारण हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे तुमच्यामुळे दुसऱ्याला होऊ शकतो.
डोळे आल्यावर त्या व्यक्तीच्या डोळ्यात बघितल्याने आपलेही डोळे येतात ही निव्वळ अफवा आहे. तर ज्याला हा संसर्ग झाला असेल त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, त्याच्याशी संबंधित वस्तू हाताळल्यास हा संसर्ग होऊ शकतो.. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे महत्वाचे आहे..