मुंबई – राज्यातील कोरोना विषाणूचे वाढते संकट लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयातील कामकाज दिवसातून केवळ २ तास चालवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करण्यात येणार असून न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद व गोवा खंडपीठांना देखील हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.
प्रभारी सरन्यायाधीश पी बी धर्माधिकारी व इतर वरिष्ठ न्यायाधीशांमध्ये एक बैठक पार पडल्यानंतर एका पत्रकाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली. या निर्णयामुळे आता उद्यापासून मुंबई उच्च न्यायालयासह न्यायालयाच्या नागपूर, औरंगाबाद व गोवा खंडपीठांमध्ये देखील दुपारी १२ ते २ वाजेपर्यंतच कामकाज चालणार आहे. याबाबतच्या पुढील निर्णयापर्यंत कामकाज याच वेळेत चालणार आहे.
या पत्रकामध्ये सर्व जिल्हा न्यायालये व दंडाधिकाऱ्यांनी केवळ महत्वाच्या विषयांवर सुनावणी करावी तसेच कामकाज ३ तासांपेक्षा अधिक काळ करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत.