नवी दिल्ली – क्रिकेटच्या रिकाम्या मैदानावर लहानपणी खेळलो आहे पण एका खेळाडूसाठी हा क्षण खूपच निराशाजनक असतो. आपली कामगिरी पाहण्यासाठी मैदान खचाखच भरलेले असले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे, असे भारताचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले आहे.
सामना आंतरराष्ट्रीय असो किंवा इंडियन प्रीमिअर लीगचा (आपीएल) असो खेळ पाहण्यासाठी मैदानावर प्रेक्षकच नसतील तर खेळाडूंसाठी ते अत्यंत निराशाजनक असते. सचिन तेंडुलकर फलंदाजीसाठी यायचा तेव्हा आणि आता महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली येतात तेव्हा प्रेक्षक त्यांच्या नावांचा गजर करतात, तेव्हा मैदानावरील वातावरण शब्दांत व्यक्त करता येत नाही. फलंदाजाने षटकार, चौकार फटकावला किंवा एखाद्या गोलंदाजाने महत्त्वाच्या फलंदाजाला बाद केले तर मैदानावर टाळ्या वाजविणारे प्रेक्षकच नसतील तर कसे चित्र दिसेल, असेही सेहवागने सांगितले.
खेळ किंवा कोणताही सामना हा एखाद्या महोत्सवासारखा साजरा झाला पाहिजे. मात्र, मैदानावर प्रेक्षकच नसतील तर ते वातावरण एखाद्या सुतकासारखे वाटेल. जे चाहते आपल्याला पाठिंबा देतात आज त्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे, त्यामुळे स्पर्धा पुढे ढकलल्या जात आहेत तसेच काही स्पर्धा रद्दही झाल्या आहेत. मात्र स्पर्धा रद्द करण्यापेक्षा रिकामे मैदान ठेवून खेळविणे अजिबात योग्य नाही, असेही सेहवाग म्हणाला.