नगर -लॉकडाऊन काळात सर्व दुकाने बंद असतांनाही महावितरण कडून अवाजवी वीज बिल आकारण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा आर्थिक भुर्दंड बसत असून, महावितरण विभागाने सरासरी बील न घेता मासिक बील घ्यावे, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे महावितरण विभागाने या कालावधीत वीज मीटर नोंद न झाल्यामुळे देयके एकत्रित व सरासरी वाढीव वीज बिल ग्राहकांना देण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात दुकाने बंद असूनही वीज बील आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
आगोदरच करोनामुळे अनेक संकटाचा सामना करत असताना महावितरणच्या या निर्णयाचा फटका ग्राहकांना बसला आहे. यामुळे त्यांना नाहक आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे महावितरणनने तीन ते चार महिन्याचे एकत्रित बिल न देता मासिक बिले द्यावीत. तसेच वीज बिल भरणा न झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.