काय ते कायदेशीर सोपस्कार त्या काळात पूर्ण करा : उच्च न्यायलय
नवी दिल्ली : देशभर खळबळ माजवणाऱ्या 2012 मधील निर्भया सामुहिक बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी एक आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या फाशी देण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आदेश दिल्ली उच्च न्यायलयाने बुधवारी दिले.
न्या. सुरेशकुमार कैत यांच्या एक सदस्यीय खंडपीठापुढे या याचिकेची सुनावणी झाली. न्या. केैत म्हणाले, या आरोपींच्या फाशीचे डेथ वॉरंट काढण्याची प्रक्रिया आठवड्यानंतर सुरू करावी. दिल्ली कारागृह कायद्यानुसार दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर आरोपींना 14 दिवसांची मुदत दिली जाते. या चारही आरोपींचे डेथ वॉरंट स्वतंत्र काढण्याची आवश्यकता नाही, असेही या निकालपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
या आरोपींना फाशी देण्यास पतियाळा हाऊस न्यायलयाने दिलेली स्थगिती फेटाळण्यासाठी केंद्र सरकार आणि तिहार कारागृह प्रशासनाने दाखल केलेल्या याचिका उच्च न्यायलयाने फेटाळून लावल्या. याबाबत सर्व बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने रविवारी निर्णय स्थगित ठेवला होता.
अक्षय ठाकूर, मुकेश सिंग, पवन गुप्ता आणि विनय शर्मा या आरोपींना एक फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार होती. त्याला पतियाळा कोर्टाने स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. पॅरामेडिकलची विद्यार्थी असणाऱ्या निर्भयावर धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी 16 डिसेंबर 2012ला सामुहिक बलात्कार केला होता. अत्यंत पाशवी पध्दतीने तिला मारहाण केली. त्यात तिच्यावर उपचार सुरु असताना सिंगापूर येथील रुग्णालयात तिचा काही दिवसांनी मृत्यू झाला होता.
तिहार कारागृहात या खटल्याची सुनावणी सुरू असताना त्यातील एक आरोपी राम सिंग याने आत्महत्या केली होती. तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली होती.