नवी दिल्ली – अखेर न्याय मिळाला आहे, आता देशातील महिलांना अधिक सुरक्षित वाटेल अशी प्रतिक्रीया निर्भयाच्या मातोश्री आशा देवी यांनी व्यक्त केली आहे. द्वारका येथे पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की या प्रकरणात न्याय मिळायला विलंब झाला असला तरी तो टाळला गेला नाही याचे समाधान आहे. आपण यापुढेही देशातील कन्यांसाठी न्यायाची लढाई देत राहु असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.
त्या म्हणाल्या की या आरोपींनी वारंवार वेगवेगळ अर्ज करून फाशी टाळण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. त्यामुळे यापुढील काळात अशा प्रकाणात सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्वे निश्चीत केली पाहिजेत, ज्या योगे पुन्हा असा विलंब किंवा टाळाटाळ होणार नाही असेही आशा देवी यांनी सांगितले. आरोपींना फाशी होऊन माझ्या मुलीला न्याय मिळे पर्यंत मला अग्निदिव्यातून जावे लागले आहे. कोणत्याही महिलेशी कसे वागावे याचे संस्कार प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना दिले पाहिजेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. काल रात्री उशिराही सुप्रिम कोर्टात एका अर्जाची सुनावणी झाली. त्याचा निर्णय झाल्यानंतर मी घरी आले आणि माझ्या मुलीच्या फोटोला कवटाळून मी माझ्या अश्रुंना वाट करून दिली असेही त्यांनी सांगितले.
20 मार्च हा दिवस निर्भया न्याय दिवस म्हणून पाळला जावा अशी अपेक्षाहीं त्यांनी पत्रकारांकडे व्यक्त केली. निर्भयाचे वडिल बद्रिनाथसिंह यांनी सांगितले की काल रात्रभर आपली पत्नी झोपली नाही.आम्हीही सारे जागे होतो. तिने न्यायाच्या प्रतिक्षेत अख्खी रात्र जागून काढली. काल रात्री सुद्धा आम्ही हायकोर्ट ते सुप्रीम कोर्ट अशी धावाधाव करीत होतो असे त्यांनी सांगितले. पण अखेर पहाटे तो क्षण आला. ज्याची आम्ही खूप वाट पहात होतो. आता माझ्या उत्तरप्रदेशातील बलिया गावी होळी खेळली जाईल असे ते म्हणाले. या साऱ्या प्रकरणात आम्हाला जी प्रतिक्षा करावी लागली ती अत्यंत क्लेषदायक होती असेही त्यांनी नमूद केले. फाशीच्या बातमीची वाट पहात अनेक महिला निर्भयाच्या घराबाहेर रात्रभर जागून होत्या.