नारायणगाव (पुणे) – बैलगाडा शर्यत कायमस्वरूपी सुरू होण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची माझी तयारी आहे. ती राजकीय आत्महत्या ठरली तरी त्यासाठी माझी तयारी आहे.
तुमच्या सगळ्यांच्या साथीने व विघ्नहर्त्याच्या साक्षीने आपणांस सांगतो की मला मिळवायचं काही नाही, गमवायचं काही नाही फक्त बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी गेली दोन अडीच वर्षे मी सातत्याने प्रयत्न करतो आहे असे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ओझर येथे झालेल्या बैलगाडा मालकांच्या मेळाव्यात सांगितले.
या अगोदर बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्याच्या यादीतील समावेश काढून टाकावा यासाठी पशुसंवर्धन विभागाचे जॉईंट सेक्रेटरी आणि मंत्री यांच्या बैठकीत चर्चा केली होती.
परंतु त्यानंतर पशुसंवर्धन मंत्रीपदाचा कार्यभार बदलला व तो गिरीराज सिंग यांच्या ऐवजी पुरुषोत्तम रूपाला यांच्याकडे गेल्यामुळे पुन्हा एकदा बैलगाडा शर्यती बद्दलचा घटनाक्रम त्यांना समजावून सांगितला.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गेली दहा वर्षांपासून बैलगाडा शर्यत बंद झाली. बैलगाडा शर्यत न्यायप्रविष्ट असल्याने आपण राजकीय हस्तक्षेप करू शकत नाही.
मद्रास व मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधातील न्यायनिवाडा पाच सदस्यीय खंडपीठासमोर होणार आहे. पाच सदस्यीय खंडपीठाने लवकरात लवकर एकत्रित बसून निर्णय घ्यावा अशी मागणी मी ॲटर्नी जनरल यांच्याकडे केली आहे.
आपण गनिमीकावा वापरून पुढील कारणांसाठी बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्याच्या यादीतून नाव वगळावे अशी मागणी करीत आहोत.
१) बैलगाडा शर्यत ही आमची संस्कृती आहे.२) बैलांची संख्या कमी होत असल्याने देशी गोवंशाचे प्रजनन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. ३) ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे एक सशक्त मॉडेल आहे. ४) आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी संधी उपलब्ध होणार असल्याने बैल या प्राण्याला संरक्षित प्राण्यांच्या यादीतून काढून टाकावे व बैलगाडा शर्यत किती ताकदीची आहे यासाठी आपण सरकारकडे भांडत आहोत.
आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मा. खासदार आढळराव पाटील यांचा अनुभव मोठा असल्याने त्यांनाही या मेळाव्यास आमंत्रित केले होते; परंतु ते त्यांच्या नियोजित दौऱ्यामुळे येऊ शकले नाही, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.
मी ज्या वाटेने चाललो आहे त्या वाटेने पुढे गेलो तर बैलगाडा शर्यत सुरू होणार म्हणजे होणार हा विश्वास माझ्या मनात आहे.
अनेकांनी आंदोलनाची भूमिका मांडली; परंतु आंदोलन कोणा विरोधात करायचे हे समजून घ्यावे लागेल. आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशी बातमी जेंव्हा पसरते तेंव्हा ज्यांच्या विरोधात आपला लढा आहे त्यांना जागं करीत चाललो आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
त्यासाठी आंदोलनाची वेळ आणि अचूक जागा ठरविणे आवश्यक आहे. योग्य दिशेने व योग्य वेळी आंदोलन झाले तर ती गोष्ट जास्त महत्त्वाची ठरते. पुढील आठवड्यात मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन आर्टिकल ४८ च्या अंतर्गत राज्य सरकारला काय करता येईल याची चाचपणी करणार आहे.
शिवाय मा. केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंग आणि नव्याने पदभार स्वीकारलेले केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांना समोरासमोर बसून बैल या प्राण्याला संरक्षित प्राण्यांच्या यादीतून काढून टाकण्याबाबत चर्चा करणार आहे.
शिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेटीची वेळ मागितली आहे. परंतु यातून काही मार्ग निघाला नाही तर असा वणवा पेटला पाहिजे की त्याची झळ दिल्लीला बसली पाहिजे. यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील व कायमस्वरूपी बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची माझी तयारी आहे, असे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले.
यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, मावळचे आमदार सुनिल शेळके, पुरंदरचे आमदार संजय जगताप यांसह अनेक राजकीय नेते उपस्थित होते.