पुणे : राष्ट्रवादी काँग्रेचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात साकारलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून काही दिवसांपूर्वी राज्यात एकच गोंधळ निर्माण झाला होता. आता त्याबद्दल अमोल कोल्हे यांनी आळंदीत आत्मक्लेश केला.
या वेळी अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोल्हे म्हणाले की, “जो एक सिनेमा ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे, जो मी २०१७ मध्ये केला होता.‘व्हाय आय किल्ड गांधी’ त्यामध्ये मी केलेल्या भूमिकेच्या संदर्भात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.” “अनेकांनी मला व्यक्तिशा ही गोष्ट सांगितली की आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातही स्वीकारलं आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात स्वीकारलं आणि त्यानंतर आम्हाला तुम्हाला या अशा भूमिकेत बघणं पसंत पडलेलं नाही.” “त्यांची नाराजी अनेक युवा कार्यकर्त्यांनी माझ्यापर्यंत पोहचवली. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांच्याबद्दल मी नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो.”असे त्यांनी यावेळी म्हटले.
“२०१७ मध्ये अजानतेपणे जी गोष्ट झाली, त्यामुळे ज्यांच्या कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो.” “जी भूमिका मी केली तो विचार, त्या विचारधारेचं समर्थन मी कधीही केलेलं नाही, कधी करणार नाही हे मी या पूर्वीच स्पष्ट केलेलं आहे.” “ज्या युवा पिढीने माझ्यावर हा विश्वास दाखवला, त्यांच्या मनात देशाच्या इतिहासाविषयी, राष्ट्रपित्यांबाबत, राष्ट्रपुरूषांबाबत एक संशयाचं वातावरण निर्माण होऊ नये. यासाठी मला वाटतं मी ही भूमिका घेणं आणि ती स्वच्छपणे समोर मांडणं हे मला जास्त गरजेचं वाटतं.”
“म्हणूनच आज महात्मा गांधीजींच्या पूर्वसंध्येस जिथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या, त्या इंद्रयणीच्या काठी आळंदीला मी येऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केलं.” अमोल कोल्हे यांनी मात्र हा चित्रपट केला तेव्हा सक्रीय राजकारणात नव्हतो असं स्पष्टीकरण दिलं होतं. नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे मागील काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून आलं. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडूनही त्यांच्या भूमिकेवरून टीका-टिप्पणी केली गेली.