साकव या शब्दाचा शब्दशः अर्थ नदीच्या, ओढ्याच्या, झऱ्याच्या दोन तीरांना जोडणारा लाकडी फळ्या वापरून बनवलेला छोटासा पूल. कोकणात असे साकव आपल्याला बरेच ठिकाणी पहायला मिळतात.साध्याशा लाकडी ओंडक्यांपासून बनवलेले पण किनारे जोडणारे. आयुष्य जगताना आपल्याला हे जाणवतं की आयुष्य हे अभ्रकाच्या थरांसारखे आहे.
नितळ, ठिसूळ पण तितकेच कणखर. या आयुष्याचे अर्थ शोधता शोधता आपण एखाद्या वळणावर विसावतो पण याचा अर्थ असा नव्हे की प्रवास मुक्कामी पोचला आहे. नवीन ठिकाणं, नवी वळणं आणि या रस्त्यांना जोडणारे क्षणांचे साकव. विश्वाच्या या अमर्याद पसाऱ्यातले हे असंख्य पाडाव या क्षणांच्या साकवाने जोडले गेलेत, जे आठवणींची साखळी गुंफतात. निसर्गाने या आठवणींचे बहाल केलेले साकव आहेत म्हणून आपला प्रवास चालू राहतो. हे पेरलेले भले बुरे क्षणच खरे बाकी मिथ्या. फक्त बुडबुडे. स्पर्धेच्या या काळात आपण सारेच खरंतर ध्येयहीन होवून धावतोय. ठरवून किंवा न ठरवता सगळेच आपल्या चाकोऱ्यांनी बांधले गेलेत. का? कशासाठी? याचा विचारही कोणी करत नाही.
थांबलो, थोडा विसावा घेतला तर स्पर्धेमध्ये मागे पडू ही भीती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर साफ दिसते. सगळ्यांनाच काही ना काही मिळवायचयं. इन्टंटली. मदतीचा हात देणे, माणुसकी जपणे, नात्यांचे बंध सांभाळणे हे सारं काही आउटडेटेड आणि आऊट ऑफ स्टॉक होत चाललय. इथेच गरज आहे माणसाला माणसाशी जोडणाऱ्या पुलाची. स्वतःपलीकडे काहीच न दिसणे, आत्मकेंद्री विचार करणे, दुसऱ्याचे अंधानुकरण करणे, स्वतःची नाती तोडून मृगजळाच्या मागे धावणे, जगाच्या कल्याणाची पोकळ चिंता करताना स्वतःच्या पायाखाली काय जळतयं याचं भान नसणे ही सारी डोळ्यांवर पट्टी बांधून आपणहून स्वीकारलेल्या अंधत्वाची लक्षणे म्हणावी लागतील. या साऱ्या धुमसत्या आयुष्याना मरूस्थळाची परस्परांना जोडणाऱ्या साकवाची गरज आहे.
जो माणसाला त्याच्या माणूसपणाशी जोडून ठेवेल. असाही एक वैचारिक प्रवाह आजकाल पहायला मिळतो तो हा की, जे कोणी आयुष्यात फारसे काही करू शकत नाहीत ते शब्दांचे पोकळ पूल बांधून स्वप्नील आशावाद आपल्यासमोर उभा करतात. आपल्याला सकारात्मकतेचे डोस पाजतात, वांझोटा आशावाद जन्माला घालतात. खरंतर कोणी कसं वागावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडीओ पाहिला. ज्यात ओव्हरटाइम करून वैतागलेली एक स्त्री घरी जाण्यासाठी “ओला कॅंब’ बुक करते असे दाखवले आहे. त्यातही कार चालक एक स्त्री आहे हे पाहून ती आपली सारी व्यथा त्या कारचालक स्त्रीला सांगते. नंतर प्रवासादरम्यान तिला कळते की ती कारचालक स्त्री मुकबधीर आहे. तेव्हा संवादाच्या पुलाचे महत्त्व त्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्त्रीला कळते. जेव्हा रस्त्यात वाहतूक पोलीस उभे राहून मार्गदर्शन करत असतात तेव्हा ते वाहतूक सुरळीत करत असतात. आपल्या या आयुष्यातले हे असे जोडले गेलेले साकव या वाहतूक पोलिसांसारखेच आहेत जे आपल्यालाही अडखळू न देता आपला प्रवास सुरळीत चालू ठेवतात. हे असे अनेक दृश्य, अदृश्य साकव आपल्या आजूबाजूला असतात.
माणुसकीचे साकव जे आपल्या वैयक्तिक जीवनाला पणाला लावून समाज आणि गरजवंत यांच्यामधला दुवा बनतात. बाबा आमटे व त्यांचे कुटुंबीय, श्री. व सौ. रवींद्र कोल्हे, पोपटराव पवार ही काही अशा मानवी साकवांची दृश्य उदाहरणे. मान्य की कोपऱ्यात तेवणारी छोटीशी पणती सारा अंधार नाही पिऊ शकत; पण आपल्या पसभार उजेडात ती मार्ग तर नक्कीच दाखवू शकते. आपणही असेच कुणालातरी कुणाशीतरी जोडणारे साकव व्हायला हवे. आशेचे कवडसे कायम राहतील अशाने. उत्तरांच्या शोधात भटकणाऱ्या कितीतरी जणांना मार्ग मिळू शकेल. यासाठी तरी असे साकव हवेतच मने जोडणारे, संवाद साधणारे आणि अडथळ्यांच्या शर्यतीत माणुसकीचे रस्ते जोडणारे. साकव हवेतच.
मानसी चिटणीस